मुंबई – शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू केलेल्या “शासन आपल्या दारी’ अभियानाचा प्रारंभ पाटण (जि. सातारा) येथे करण्यात आला. त्यात 27 हजार पात्र लाभार्थींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात यश मिळाल्याने, पाटणच्या अभियानाने राज्याचे लक्ष वेधून घेतले. सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या अभियानाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत पाटणच्या अभियानाचे यश अधोरेखित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत पाटणच्या यशस्वी अभियानाबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कौतूक करत पाटणचा हा पॅटर्न इतर जिल्ह्यांमध्ये अंमलात आणावा, अशी सूचना केली.
राज्य शासनाच्या “शासन आपल्या दारी’ अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाटणमधील दौलतनगर-मरळी येथे मोठ्या उत्साहात झाला होता. त्यावेळी मोफत आरोग्य शिबिर आणि पं. दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. पाटणमध्ये “शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून तब्बल 27 हजार पात्र लाभार्थींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. या अभियानाद्वारे तहसिल कार्यालयाकडून 10 हजारांहून अधिक लाभार्थींना लाभ दिला गेला.
तसेच पंचायत समितीकडून 9 हजार 371, वेल्फेअर बोर्ड साताराकडून 1 हजार 551, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून 1 हजार 295, तहसिल कार्यालय कराडकडून 1 हजार 232 यासह प्रांत कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कराड, नगर पंचायत पाटण, महावितरण, वन विभाग, दुय्यम निबंधक, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा रुग्णालय कराड यांच्यामार्फत लाभार्थींना लाभ देण्यात आला. तसेच यावेळी आयोजित आरोग्य शिबिरात परिसरातील एक हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला. या अभियानाचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात 500 उमेदवारांनी भाग घेतला. यात 15 जणांना त्याच दिवशी नोकरीचे नियुक्ती पत्र मिळाले, तर 251 जणांची नोकरीसाठी प्राथमिक निवड झाली.
शासकीय अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत. “शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जनतेच्या दारात जात आहेत. पाटणमध्ये हे अभियान आम्ही यशस्वी करून दाखवले. मात्र एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता, या अभियानाचा “सातारा पॅटर्न’ राबवून तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने राबवून अधिकाधिक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊ, अशी भावना उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.