चिंबळी – पुणे-नाशिक महामार्गावर चाकण शहर हे आता वाहतूक कोंडीचे शहर म्हणून ओळखू जावू लागले आहे. चाकण व औद्योगिक पंचक्रोशीत दररोज केव्हाही वाहनांची मोठी कोंडी होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उद्योग नगरित कारखाने सुटल्यानंतर होणारी वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाल्याने सर्वांची डोकेदुखी वाढली आहे.
भोसरी बाजूकडून चाकणकडे येताना महामार्गावरील मोशी, चिंबळी फाटा, स्पायसर चौक, आळंदी फाटा, मुऱ्हे वस्ती, डोंगरे वस्ती, तळेगाव व आंबेठाण चौकात होणाऱ्या कोंडीमुळे प्रवासी तसेच स्थानिक नागरिक वैतागले आहेत. चाकण शहरासह लगतच्या भागांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या भागातील नागरिकांकडे असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीवर प्रचंड ताण आला आहे.
शिवाय पुणे-नाशिक महामार्गावरील आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कित्येक पटींनी वाढली आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे चाकण भागात कच्चा व पक्का माल घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. रोज सायंकाळी कंपन्यांतून सुटणारे कामगार आणि अवजड वाहतूक यामुळे नाशिक मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा होत आहे.
अंमलबजावणी आवश्यक
शिक्रापूरहून तळेगाव दाभाडेकडे जाणारी वाहने चाकण मधील माणिक चौकातून पुण्याकडे वळवण्यात येणार आहेत. आळंदी फाटा-स्पायसर चौक येथून चाकण एमआयडीसी मधील अंतर्गत मार्गाने ही वाहतूक एचपी चौक ते पुढे तळेगाव, मुंबई अशी वळवण्यात येणार आहेत. बालाजीनगर येथे सिग्नल बसविण्यात येणार असून, माणिक चौक ते बालाजीनगर मार्गावर फक्त एकेरी वाहतूक करण्याचा वरिष्ठ वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. असा बदल झाल्यानंतर वाहतूक कोंडीवर काही अंशी मार्ग निघण्याची शक्यता वाटते.