पिंपरी – पिंपरी येथील बाबा छंतुराम लाल मंदिर येथे आंतरराष्ट्रीय सिंधी समाज संघटन आणि सेंट्रल पंचायत याच्या संयुक्त विद्यमाने “विभाजन का दर्द’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशात “विभाजन विनाशिका’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता. त्या अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला.
1947 मध्ये देशाची फाळणी झाली आणि भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती करण्यात आली. त्या वेळी सिंध प्रांत पाकिस्तानला देण्यात आला. त्यामुळे तेथील सिंधी आणि शिख बांधवांवर निर्वासित होण्याची वेळ आली. अशा निर्वासितांसाठी पिंपरी येथे छावणी उभारण्यात आली होती. तेव्हापासून पिंपरी कॅम्प येथे सिंधी आणि शिख बांधवांचे वास्तव्य आहे. त्या फाळणीचे साक्षीदार असलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यात या वेळी भगवानदास खत्री, शिवनदास पमनानी, कन्हैयालाल केसवानी, गणेशोमल पंजाबी यांचा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप सत्कार करण्यात आला.
या वेळी शिवनदास पमनानी, कन्हैयालाल केसवानी म्हणाले की, कट्टर हिंदुत्ववादी राष्ट्रभक्त असेलले नागरिक तेथील संपूर्ण संपती सोडून भारतात आले. त्या वेळी महाराष्ट्रातील उल्हासनगर आणि पिंपरी येथे त्यांच्यासाठी छावणी उभारण्यात आली तेंव्हापासून ते भारताचे नागरिक म्हणून राहू लागले आणि विषेश म्हणजे महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी त्यांना आपले मानून आजही मनापासून एकत्र नांदत आहेत.
या वेळी शंकर जगताप म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली आपला देश जगातील तिसरी अर्थ व्यवस्था असलेला देश म्हणून जगासमोर आणायचा आहे. त्यासाठी आपण सगळे मिळून एकजुटीने त्याच्या मागे उभे राहून भारत देश जगातील सर्वांत प्रगत करण्याचा प्रयत्न करूया.
प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश भारतीय जनता पक्षाचे दक्षिण आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, ज्योतिका मलकानी, रेखा कडाली, वैशाली खाडये, गणेश ढाकणे, गणेश वाळुंजकर, शीतल शिंदे, शैलेश मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर जेठवानी, गोपी आसवानी, किरण रामनानी, कंचन रामनानी, जयदेव डेब्रा, राजेश चांदवानी, अजीत कंजवानी, मनोज पंजाबी, इंदर बजाज, सुशिल बजाज आदींनी परिश्रम घेतले.