– हर्षद कटारिया
बिबवेवाडी – करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखताना डॉक्टर व पोलिसांची दमछाक होत असताना दुसरीकडे मात्र शहरातील काही उच्चभ्रू सोसायट्यांच्या टेरेसवर लॉकडाऊनचा फज्जा उडवत रंगीत-संगीत पार्ट्या तसेच करमणुकीचे खेळ सुरू आहेत, अशा ठिकाणी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग अशा नियमांचे उल्लंघन करून “लॉकडाऊनची मजा’ लुटली जात आहे.
पुणे शहर तसेच उपनगरांत गेल्या दोन दिवसांत करोना बाधित रुग्णाची संख्या वाढली आहे. रुग्ण आळण्याचे प्रमाण वाढत आहे, अशा स्थितीत उच्चभ्रू आणि “स्टॅन्डर्ड’ समजल्या जाणाऱ्या गृह सोसायट्यांमधील इमारतींच्या टेरेसवर पार्ट्या रंगत असल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे अशा पार्ट्यांसाठी बाहेरून खाद्यपदार्थ मागविले जात आहेत. अशी “विशेष मागणी’ पूर्ण करण्यासाठी परिसरातील संबंधित विक्रेत्यांकडून दुप्पट, तिप्पट दर लावून पाव, मिठाई, चीज, वेफर्स, बटर यासह अन्य वस्तू पुरविल्या जात आहेत. अशा पार्ट्यांतून गेल्या काही दिवसांत अनेकांनी चांगला बिझनेस केला असल्याची चर्चा आहे.
रात्री उशीरा उंच इमारतीवर अशा पार्ट्या रंगत असल्याने पोलिसांचे याकडे लक्ष जात नाही. परंतु, अन्य इमारतीवरून पाहिले असता अनेक इमारतींचे टेरेस मध्यरात्रीपर्यंत झळकत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत: विकेंड साजरा करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने किंबहुना तशी सवय असल्याने शनिवार आणि रविवारी होणाऱ्या अशा पार्ट्यांची संख्या अधिक आहे.
लॉकडाऊनचे नियम मोडून इमारतींच्या टेरेसवर पार्ट्या करणाऱ्यांवर अंकुश कोण ठेवणार? अशी चर्चा परिसरात असून अशा पार्ट्यांतून करोना बाधितांची संख्या वाढू शकते. पार्ट्यांचे आयोजन करताना तसेच येथे बाहेरून खाद्य पदार्थ येत असल्याने यातून करोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. गृह सोसायटीतील काही हौशी सभासदांकडूनच अशा पार्ट्यांचा आग्रह होत असून ते स्वत:सह इतरांनाही करोनाच्या धोक्यात लोटत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.
सकाळी, सध्याकाळी मॉर्निंक वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. तसेच, सोसायटीमध्ये सार्वजनिक जागेत एकत्र गप्पा मारत बसणे, क्रिकेट खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी टेरेस पार्ट्यांही बंद पाडाव्यात, अशी मागणी काही सजग नागरिकांकडून होत आहे.
सोसायटीतील सभासदांनी टेरेसवर एकत्र येऊन नियम तोडू नये. अन्यथा जमाव बंदी 144 व 188 कलम नुसार गुन्हे दाखल करण्यात येतील. कोणीही टेरेसवर एकत्र येऊन नियम मोडत असतील तर नागरिकांनी पोलिसांना कळवावे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– अमोल रसाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महर्षिनगर