पारनेर – शेतकऱ्यांनी पिकविलेला मालाला बाजारभाव मिळत नसल्याने भाजप- शिंदे सरकारने शेतकरी देशोधडीला लावला असून 25 गोणी कांदा विकल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती एक रुपया पडत असेल तर माझ्या शेतकऱ्यांनी जगायचे कसे. शेतकरी राजाला रात्री 12 वाजता उठून पिकांना पाणी द्यायला जावे लागते.
त्यात वीज ही कमी दाबाने मिळत असल्याने पंप जळणे, रोहित्र जळणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाने निर्यातबंदी उठवून कांद्याला 20 ते 25 रुपये हमीभाव द्यावा व विजेची समस्या दूर करावी, अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून शासनाला धडा शिकविण्याचे काम करणार असल्याचा इशारा आमदार नीलेश लंके यांनी दिला.
कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने पारनेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज सकाळी 11 वाजता आमदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा येथील चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या रास्तारोको आंदोलन सुमारे एक तास चालले. यादरम्यान पारनेर, नगर, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या.
आमदार लंके यांनी शासकीय अधिकारी उपस्थित होत नाही तोपर्यंत रास्तारोको आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने पोलीस प्रशासनापुढे मोठा तिढा निर्माण झाला. आठ दिवस अगोदर प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर एक आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर बसतो मात्र महसूलचे तहसीलदार, प्रांत साधे निवेदन घेण्यासाठी येऊ शकत नाही. रस्ता रोको मागे घेतला जाणार नाही, आमच्यावर गुन्हे दाखल करा, असा पवित्रा लंके यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
यादरम्यान महामार्गावर सुपा ते शिरूरच्या दिशेने सुमारे तीन किलोमीटर व सुपा ते नगरच्या दिशेने सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे एक तास चाललेल्या या रास्ता रोको दरम्यान पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मध्यस्थीनंतर आमदार नीलेश लंके यांनी नायब तहसीलदार गणेश आढारे यांना निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
आमदार लंके यांनी स्वतः हा ट्रॅक्टरवर बसून महामार्गावर कांद्याने भरलेला ट्रेलर ओतून शासनाचा निषेध केला. यावेळी अशोक सावंत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, माजी नगराध्यक्ष विजय औटी, राष्ट्रवादी कॉंग्रेस युवती तालुकाध्यक्षा पूनम मुंगसे, युवा नेते सचिन पठारे, सरपंच प्रकाश गुंड, सरपंच मच्छिंद्रनाथ दिवटे, माजी सरपंच विजय पवार, सचिन पवार, सचिन काळे, प्रकाश पवार, सुभाष गवळी, जयसिंग गवळी, उत्तम पठारे, दादा शिंदे, माजी सरपंच संदीप मगर, भाऊसाहेब भोगाडे, उपसरपंच सुधीर पवार, कारभारी पोटघन, दौलत गांगड, चेअरमन संतोष गवळी, हभप बापू दळवी, खंडू भूकंप, संजय पवार, शिवाजी रसाळ, सुभाष करंजुले परिसरातील सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, महिला पदाधिकारी व कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“एक तालुक्याचा आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर बसतो मात्र महसूलचे प्रशासन हे विखेंच्या दबावाखाली काम करत असून शेतकऱ्यांचा मुरमाने भरलेला ट्रॅक्टर पकडायला यांना रात्रीचा वेळ मिळतो. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ मिळत नाही. मालकाकडून दोन ते अडीच लाख रुपये दंड वसूल केला जातो. अशा या हुजरेगिरी करणाऱ्या प्रशासनाचा निषेध करतो.” – नीलेश लंके, आमदार