श्रीगोंदा – जमिनीवरून सुरू असलेल्या वादाच्या रागातून दशरथ साहेबराव शिर्के (वय 65, रा. बाबुर्डी, ता. श्रीगोंदा) यांचा टणक हत्याराने मारहाण करून खून करण्यात आला. याप्रकरणी मयताचा मुलगा श्रीरंग शिर्के यांच्या फिर्यादीवरून रामा राजू बरकडे, बिट्या राजू बरकडे (दोघे रा.बाबुर्डी) या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस अधिक तपास करत आहेत.
तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील शेत गट नं. 29 मध्ये श्रीरंग शिर्के यांच्या नावावर 3 एकर शेती होती. त्यापैकी 1 एकर जमीन भाऊसाहेब बाबा बरकडे यांना 90 हजार रुपये घेऊन तात्पुरती खरेदी करून दिली होती. फिर्यादीकडे पैसे येतील, त्यावेळी पैसे माघारी देऊन त्यांनी विकेलेली जमीन पुन्हा माघारी देणार होते. जमिनीवर शिर्के यांचा ताबा होता.
27 मे 2022 रोजी भाऊसाहेब बाबा बरकडे, राजु बाबा बरकडे, रामा राजु बरकडे, बिट्या राजु बरकडे व इतरांनी जमिनीच्या ताब्याबाबत शिर्के यांच्याशी वाद घातले होते. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी राजु बरकडे व त्याच्या दोन्ही मुलांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.
आज (दि.4) सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे चहाच्या टपरीवर श्रीरंग शिर्के गेले. टपरीकरिता असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये बाजेवर वडील झोपलेले दिसले. त्यांच्या अंगावर पांघरून टाकलेले होते. बाजूच्या दुकानाच्या दरवाजाची बाहेरून कडी लावलेली दिसली. फिर्यादी यांनी ती उघडली व दुकानाचे पाठीमागील बाजूस असलेल्या शेतात जात असताना एक बांबू खाली जमीनीवर पडलेला दिसला.
त्या बांबुला एका बाजूने रक्त लागलेले दिसत होते. त्यामुळे वडिलांकडे काय झाले याबाबत विचारण्याकरिता अंगावरील पांघरून बाजूला केले असता वडिलांच्या डोक्याला, तोंडाला जबर मारहाण झाल्याचे दिसले. त्यांची हालचाल बंद झाली होती.
वडिलांना जमिनीच्या वादाच्या रागातून रामा बरकडे, बिट्या बरकडे यांनी डोक्यात काहीतरी टणक व कठीन हत्याराने तसेच लाकडी बांबूने जबर मारहाण करून जीवे ठार मारले. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, जमिनीच्या वादासोबतच या खुनामागे अन्य काही कारण आहे का? याचाही पोलीस तपास करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरीक्षक समीर अभंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.