अहमदनगर – देशासाठी करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक ठरली आहे. विषाणू संसर्गाचा वेग अधिक असल्याने या लाटेमध्ये रुग्णसंख्येबरोबरच मृतांचा आकडाही वाढल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्या लाटेचा आलेख खाली येत असल्याची दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे.
मात्र, अशातच आज करोनाचा धोका अद्यापही टळलेला नाहीये हे अधोरेखित करणारी आकडेवारी हाती आली आहे. या आकडेवारीनुसार मे महिन्यामध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर या एका जिल्ह्यातील ९९२८ बालकांना करोनाची बाधा झाली होती.
बालकांमधील करोना संसर्गाच्या आकडेवारीबाबत माहिती देताना, जिल्हा प्रशासनाने ही बाबा चिंताजनक नसल्याचं म्हंटलंय.
याबाबत अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी, ‘जिल्ह्यात ९९२८ बालकांना करोना बाधा झाली पैकी ६७०० बाधित बालके ११ ते १८ वयोगटातील होती. तर काही १ वर्षांखालील बालकांना देखील संसर्ग झाला होता.’ अशी माहिती दिली.
“संसर्ग झालेल्या बालकांपैकी ९५ टक्के बालकांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत. त्यामुळे यामध्ये चिंता करण्यासारखे काहीही नाही. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना संसर्ग होण्याची शक्यता असल्याने त्यांची काळजी घेणे हीच आता सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी.” असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील बालकांमधील करोना बाधेचे प्रमाण वाढत असल्याची माहिती राज्य आरोग्य निरीक्षक प्रदीप आवटे यांनी एका इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाला दिली.