मुंबई,- अँटिलियासमोर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी परमबीर सिंह हेच मास्टरमाईंड असल्याचे समजले होते, असा जबाब माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. या जबाबाची नोंद ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात नोंद करण्यात आली आहे.
अँटिलियासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आपल्याला माहिती देताना परमबीर सिंह दिशाभूल करत होते. या प्रकरणात त्यांचे सहकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले होते आणि सिंह हेच त्याचे मास्टरमाईंड आहेत, असे आपल्याला कळले होते. म्हणून त्यांना आयुक्तपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आणि नैतिकता म्हणून आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असे अनिल देशमुख यांनी सांगितल्याचे ईडीने आरोपपत्रात नमूद केले आहे.
परमबीर सिंह यांना 17 मार्च 2021 रोजी आयुक्तपदावरून हटवल्यानंतर त्यांनी 20 मार्च 2021 रोजी माझ्यावर खोटे आरोप केले. अँटिलिया घोटाळा आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांच्यासह त्यांचे जवळचे मित्र सचिन वाझे आणि अन्य चार जणांची नावं समोर आल्याने सिंह यांना आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते.
सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी मनसुख हिरेन यांनी स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या काठ्या लावल्याचा आरोप होता, या प्रकरणी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली होती. 5 मार्च 2021 रोजी विधानसभा सुरू असताना सिंह यांना विधानसभेत ब्रीफिंगसाठी बोलावले होते, तेव्हा मी गृहमंत्री होतो आणि सिंह यांना बोलावले तेव्हा मी, अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, लिमये आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होतो. त्या ब्रीफिंग दरम्यान अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हत्येच्या संदर्भात सिंह देत असलेली ब्रीफिंग दिशाभूल करणारी होती.
यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला. काही दिवसांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ब्रीफिंग होत असताना मी, मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि गृह विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होतो. त्या ब्रीफिंग दरम्यान हे देखील समोर आले की, सिंह त्यांच्या उत्तराने आमची दिशाभूल करत आहेत आणि सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही देशमुखांनी ईडीच्या जबाबात म्हटले आहे.