मुंबई – शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणि उदय सामंत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संधान साधून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.
आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या राजकीय भवितव्याबाबत निर्णय घेणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. सामंत आणि परब यांनीच आपल्याला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. आपण शिवसैनिकच राहणार आहोत आणि कधीही शिवसेना सोडणार नाहीं असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
रामदास कदम हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पर्यावरण मंत्री होते. ते सेनेचे निष्ठावान नेते म्हणून परिचीत आहेत. तथापि त्यांनी शिवसेनेच्याच दोन मंत्र्यांवर जाहीर आरोप केल्याने शिवसेनेतील मतभेद प्रथमच चव्हाट्यावर आले आहेत.
आज पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले की अनिल परब आणि उदय सामंत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी हातमिळवणी करून रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना संपवण्याचा चंग बांधला आहे. कोकण हा शिवसेनेचा पहिल्यापासून बालेकिल्ला राहिला आहे पण या दोघांनी शिवसेनेलाच संपवण्याचा प्रयत्न चालवला आहे असे ते म्हणाले.
परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालक मंत्री आहेत तर उदय सामंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री आहेत. या दोन्ही मंत्र्यांच्या कारभारावरही कदम यांनी यावेळी जोरदार टीका केली.