पंढरपूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी माता मंदिरास आणि गांभाऱ्यास 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मंदिर समितीच्या वतीने फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. यासाठी विविध प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गळ्यामध्ये तिरंगा परिधान केल्याने देवाची रूप अधिकच खुलून दिसत आहे. विशेष म्हणजे मंदिरांमध्ये फुलांपासून तयार केलेले सुंदरसे अशोक चक्रदेखील तयार करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 25 जानेवारी रोजी रात्रभर आरास करण्याचे काम पुणे येथील सचिन चव्हाण, मोरया ग्रुपच्या वतीने ही तिरंगा फुलांची आरस करण्यात आली. तिरंग्याने सजललेल्या या आरास कामासाठी झेंडुची फुले, तुळस, अष्टर यासह अन्य फुलांचा वापर करण्यात आला. या विविध फुलांमधून वेगवेगळा सुगंध दरवळत होता.
प्रजासत्ताक दिनी सुट्टी आल्याने मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. सध्या चंद्रभागा नदीपात्रात पाणी असल्याने पवित्र स्नान करण्यासाठी या ठिकाणीही सकाळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, विठु-रुखुमाईला तिरंग्याने सजवलेल्या फुलांच्या आरासमध्ये पाहून भक्तांनाही देशभक्ती आणि विठ्ठलाच्या भक्तीचा दुहेरी संगम अनुभवता आला आहे.