पंढरपूर – सरकारच्या वीज तोडणी शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावीतरणला वैतागून तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. “परत शेतकरी म्हणून जन्माला येणार नाही” असं म्हणत त्याचा व्हिडीओ बनवून मगरवाडी येथील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. सूरज जाधव (मरगवाडी, ता. पंढरपूर) असे आत्महत्या केलेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
माहितीनुसार, सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणवर वैतागून ही आत्महत्या झाल्याचे समजते, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याने आपला व्हिडिओ बनवला, आणि सोशल मिडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने परत शेतकरी जन्माला येणार नाही असे सांगितले आहे. यानंतर सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
या प्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या सरकारला लाज वाटली पाहिजे, थोड्या थोड्या कारणाने भांडण करणारे हे मंत्री आहेत. आता तर उर्जामंत्र्यांनी राजीनामाच दिला पाहिजे व शेतकऱ्यांच्या पोरांनी आता सरकारमध्यला मंत्र्यांना बदडलं पाहिजे, असं तुपकर म्हणाले. आत्महत्या नसून ही सरकारने व ऊर्जा मंत्र्याने शेतकऱयांना खोट बोलून ही हत्या केल्याचं स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर संतापाने म्हणाले.