नवी दिल्ली – पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुका या लोकशाहींचा उत्सव न ठरता प्रत्यक्षात मृत्यूचे थैमान झालेल्या निवडणुका ठरल्या आहेत आणि त्याला सत्तारूढ तृणमुल कॉंग्रेस जबाबदार असल्याची टीका केंद्रीय मंत्री निशीथ प्रामाणिक यांनी केली आहे. या हिंसाचारात नेमके किती जण मरण पावले याची अचुक आकडेवारीही हे सरकार ठेवत नाही असे त्यांनी म्हटले आहे.
निवडणुका हा प्रजासत्ताकचा सण असतो, पण यावेळी बंगालमधील पंचायत निवडणुका मृत्यूचा उत्सव ठरल्या. बंगालमधील पंचायत निवडणुका जाहीर झाल्यापासून किती लोकांचा जीव गेला याची अधिकृत आकडेवारीही राज्य सरकार बाहेर काढणार नाही.
बंगालमध्ये राजकीय हिंसाचार आणि चकमकी हे काही नवीन नसले तरी शनिवारी पंचायतींच्या मतदानादरम्यान दिसलेला हिंसाचार ‘अभूतपूर्व’ होता, असेही त्यांनी नमूद केले.अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले तर बरेच जण बेपत्ता आहेत. हिंसाचारात बेपत्ता झालेले लोक जिवंत आहेत की नाही हे आम्हाला माहीत नाही. या वर्षी ज्या पद्धतीने पंचायत निवडणुका पार पडल्या त्यामुळे आमची मान शरमेने खाली गेली आहे. हा हिंसाचार पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या इतिहासातील एक ज्वलंत अध्याय ठरला आहे असेही प्रामाणिक यांनी म्हटले आहे.
राष्ट्रपती राजवट लागू करा-भाजपची मागणी
पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांवेळी झालेल्या हिंसाचारावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपने हिंसाचाराचा निषेध करून त्या राज्यातील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसला घेरण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
हिंसाचारावरून भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. राज्य प्रशासनाच्या अखत्यारीत मुक्त निवडणुकांची अपेक्षा केवळ मृगजळ ठरेल. राष्ट्रपती राजवटीखाली निवडणुका झाल्या तरच त्या योग्य रित्या होतील, असे त्यांनी म्हटले. भाजपचे आणखी एक नेते राहुल सिन्हा यांनी थेट राज्याच्या निवडणूक आयोगावर निशाणा साधला. तो आयोग कर्तव्य निभावण्यात अपयशी ठरला आहे. तृणमूल सरकारच्या निर्देशावरून आयोग कार्य करत आहे, असा आरोप त्यांनी केला.