कार्ला, {संजय हुलावळे} – कोळी, आग्री, सिकेपी, सोनार अशा विविध समाजाची कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी आहे. कार्ला गडावरील चैत्री यात्रेचा कुलस्वामिनी आई एकवीरा देवीचा मानाचा पालखी सोहळा सोमवारी (दि. १५) सायंकाळी कार्ला वेहरगाव गडावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी भाविकांनी ‘आई माउलीचा उदो उदो’ ‘ आई आयलो’च्या नामघोष केला. तसेच देवीच्या गीतांच्या तालावर नृत्य करीत आनंद व्यक्त केला. हजारो भाविकांनी एकवीरा देवीचे दर्शन घेतले.
पालखीचे मानकरी असलेल्या चौल, आग्राव व ठाणेकर यांनी पालखीला खांदा लावत ‘आई राजा उदो उदो चा गजर केला. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी व सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुंबई व कोकण भागातून शेकडो पायी पालख्या गडावर आल्या होत्या. काही दिवस कित्येक तास पायी प्रवास करत भाविक कार्ल्यात दाखल झाले होते.
यात्रेकरिता कार्ला व वेहेरगावचा परिसर सजला होता. हारफुले, प्रसाद, कुंकू व खेळणी विक्रेते यांची दुकाने साहित्यांनी सजली होती. येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये, याकरिता तालुका प्रशासन, मंदिराचे विश्वस्त मंडळ व पोलीस विभाग यांच्याकडून सातत्याने विविध विभागाच्या बैठका घेत यात्रेसाठी नियोजन करण्यात आले होते.
यात्रा काळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना योग्य व सुलभ प्रकारे दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी मावळ तालुक्याचे तहसिलदार विक्रम देशमुख, लोणावळा पोलीस उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, वेहेरगावच्या सरपंच व विश्वस्त वर्षा मावकर,
उपसरपंच शंकर बोरकर, विश्वस्त नवनाथ देशमुख, मारुती देशमुख, सागर देवकर, विकास पडवळ, संजय गोविलकर, महेंद देशमुख, मंडल अधिकारी आशा धायगुडे, तलाठी दिपक धनवडे वन विभागाचे अधिकारी प्रमोद रासकर, पोलीस पाटील अनिल पडवळ, तसेच विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन नियोजन केले होते.
पोलिसांची मोठी कुमक
यात्राकाळात कार्ला परिसरातील गावात तीन दिवस पूर्णपणे दारुबंदी करण्यात आली होती. तसेच यात्राकाळात गडावर फटाके वाजविण्यास बंदी केली होती. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक,
लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्यासह चार पोलीस निरीक्षक, ३० सहायक निरीक्षक, ३५० कर्मचारी, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल, विविध सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी, असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.