नवी दिल्ली : भारताचा शेजारी पाकिस्तान दिवसागणिक काही ना काही कुरापती करताना दिसतो. याच कुरापतीमध्ये भर घालण्यासाठी पाकने नवा डाव आखला आहे. कर्तारपूर गुरूद्वाराच्या देखभालीची जबाबदारी पाकिस्तान शीख गुरूद्वारा समितीकडून काढून घेत नव्या संस्थेला सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुरूद्वाराच्या देखभालीसाठी निवडण्यात आलेल्या या संस्थेत एकाही शीख सदस्याला स्थान देण्यात आलेले नाही. आता कर्तारपूर गुरूद्वाराच्या देखभालीची जबाबदारी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटला स्थापन सोपवण्यात आली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे सर्वत्र निषेध नोंदवण्यात येत आहे.
कर्तारपूर गुरूद्वाराच्या देखभालीची जबाबदारी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटला सोपवण्यात आली असून यामध्ये असलेले सर्व सदस्य हे Evacuee Trust Property Board (ईटीपीबी) शी संबंधित आहे. ईटीबीपी या संस्थेवर पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी मोहम्मद तारीक खान यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या या निर्णयानंतर भारतातूनही याला विरोध करण्यात आला आहे. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख बादल यांच्याकडूनही पाकिस्तानच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाचा आम्ही विरोध करत आहोत.
पाकिस्तान सरकारने गुरूद्वाराच्या देखभालीची जबाबदारी अशा संस्थेकडे दिली आहे ज्यात एकही शीख सदस्य नाही हे निषेधार्ह आहे. पाकिस्तानातील शीख अल्पसंख्यांकांच्या अधिकारावर ही गदा आहे, अशी प्रतिक्रिया शिरोमणी अकाली दलाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.