भारताने आरोप फेटाळले
नवी दिल्ली – चिनाब नदीच्या प्रवाहातील पाण्याचे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात घटल्याची ओरड पाकिस्तानने सुरू केली आहे. मात्र हा बिनबुडाचा आरोप असल्याची टीका भारताच्यावतीने करण्यात आली आहे.
भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त सईद मोहम्मद मेहेर अली शाह यांनी भारतीय उच्चायुक्त प्रदीप कुमार सक्सेना यांना पत्र पाठवून हा आरोप केला आहे. भारतातून पाकिस्तानमध्ये चिनाब नदीचा प्रवाह जाणाऱ्या मारला हेडवर्क्स येथील पाण्याचा प्रवाह 31 ,853 क्युसेकवरून 18,700 क्युसेकपर्यंत घटला असल्याचा आरोप त्या पत्रात करण्यात आला आहे.
मात्र हा आरोप तपासला गेला असून तो अगदी बिनबुडाचा आहे, असे इंड्स पाण्यासाठीच्या भारतीय आयुतांनी म्हटले आहे. चिनाब नदीचा अखनूर आणि तावी नदीचा सिध्रा येथील भारतातील प्रवाह नियमित आहे. त्यात कोणताही फेरबदल झालेला नाही, असे सक्सेना यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. या पाण्याच्या प्रवाहाबद्दलचे उत्तर पाकिस्तानलाही कळवण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान 1980 साली झालेल्या सिंधू पाणी करारानुसार कायम स्वरुपी जल आयोगाची नियुक्ती केली गेली आहे. त्या आयोगावर दोन्ही देशांचे प्रतिनिधी नियुक्त आहेत. या आयोगाची वर्षातून एकदा बैठक अपेक्षित आहे. ही बैठक आळीपाळीने भारतात आणि पाकिस्तानात होत असते.
रावी, ब्यास आणि सतलज या पूर्वेकडील नद्यांचे पाणी भारताला उपलब्ध करून दिले गेले आहे. या नद्यांच्या 168 दशलक्ष एकर फूटापैकी 33 दशलक्ष एकर फूट म्हणजे सुमारे 20 टक्के पाण्यावर भारताचा अधिकार आहे. त्यापैकी 93.94 टक्के पाण्याचा वापर भारताकडून केल अजातो. सिंधू, चिनाब आणि झेलम पश्चिमेकडील नद्यांचे पाणी पाकिस्तानसाठी उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. या सिंधू जलआयोगाची वार्षिक बैठक करोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्याची शिफारस भारताने मार्च महिन्यात केली होती. ही बैठक दरवर्षी 31 मार्च रोजी होत असते.