राजगुरूनगर -खेड तालुका भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून परप्रांतीयासह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 1430 कामगारांना त्यांच्या मूळगावी शासकीय परवानगी घेऊन पाठविण्यात आले आहे. अजूनही सुमारे 1 हजार कामगारांनी मागणी केली असून त्यांची शासकीय परवानगी घेऊन त्यांना मूळगावी पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असे भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांनी सांगितले.
भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून परप्रांतीय कामगार व आपल्या राज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. अनेक कामगारांकडे व कुटुंबाकडे घरी जाण्यासाठी पैसे नव्हते. मात्र संघटनेच्या माध्यमातून विजय डोळस यांनी हा खर्च उचलला शिवाय या कामगारांना घरी पोहोचेपर्यंत दोन वेळचे दोन दिवसांचे जेवण माध्यमातून देण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून संकघटनेच्या माध्यमातून उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, ओरिसा, राजस्थान, बीड, परभणी, उस्मानाबाद वाशीम या ठिकाणी 1430 कामगार व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना जीप बसच्या माध्यमातून कामगार व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नोंदणी व वैद्यकीय तपासणी करून पाठविण्यात आले.
यावेळी विजय डोळस, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे, राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, स्टेट बॅंकेचे गिरीश चावरे, भीमशक्ती संघटनेचे अनिल जाधव, दीक्षा डोळस, विक्रांत भोर, धनंजय भागवत, राहील पिंगळे, राहुल थिगळे, सचिन लोंढे,राहुल डोळस आदी उपस्थित होते.
बसमध्ये बांधला साडीचा पाळणा
परभणी येथे जाणाऱ्या कुटुंबात अनेक लहान मुले होती बसमध्ये जाताना त्यांच्या आई वडिलांनी साडीचा पाळणा करून त्यांना बांधून त्यात झोपवून नेले. या बसमध्ये जवळपास 15 कुटुंबे पाठविण्यात आली.