इस्लामाबाद – “सार्क’ परिषद पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाण्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आशा व्यक्त केली आहे. ही परिषद आयोजित करण्यामधील कृत्रिम अडथळे हटवले गेल्यानंतर ही परिषद आयोजित केली जाईल, अशी आशा खान यांनी व्यक्त केली आहे. “सार्क’च्या सरचिटणीस इसाला रुवान वीराकोन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान इम्रान खान यांनी ही आशा व्यक्त केली.
“सार्क’ परिषद पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाण्यामध्ये काही कृत्रीम अडथळे उभे केले गेले आहेत. हे लवकरात लवकर दूर केले जावेत अशी अपेक्षा इम्रान खान यांनी व्यक्त केली. “सार्क’च्या माध्यमातून सर्वसमावेशक आणि विधायक वातावरण निर्माण केले जाऊ शकेल, असा विश्वासही इम्रान खान यांनी व्यक्त केला.
अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश असलेल्या “सार्क’ या प्रादेशिक सहकार्य गटाची 2016 पासून कोणतीही बैठक झालेली नाही. यापूर्वी 2014 मध्ये काठमांडूमध्ये अखेरची द्वैवार्षिक बैठक झाली होती. 2016 मध्ये “सार्क’ची बैठक इस्लामाबादेत होणार होती.
मात्र उरी येथे भारतीय लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने सुरक्षिततेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यानंतर भूतान, बांगलादेश आणि अफगाणिस्ताननेही या परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला होता.