गेल्या आठवडाभरापासून सिंध प्रांतातील सान विभागात हजारो नागरिक वेगळ्या राष्ट्राची मागणी करून आंदोलन करीत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील अन्य शक्तिशाली नेत्यांनी याप्रश्नी हस्तक्षेप करावा, अशी मागणी ते करीत आहेत. पाकव्याप्त काश्मीर असो किंवा बलुचिस्तान असो, सर्वत्र अशीच मागणी होत असून, पाकिस्तान अंतर्गत समस्यांनी पुरता बेजार झाला आहे. या समस्यांमधून बाहेर पडणे इम्रान खान यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे.
पाकिस्तानातील सिंध प्रांत हा शतकानुशतके कट्टरपंथीयांच्या अविचाराला बळी पडलेला प्रांत आहे. त्यातच या प्रांतावर लष्करी वर्चस्व अधिक राहिले. ज्या स्वातंत्र्याची अपेक्षा तेथील लोकांनी केली, ते त्यांना मिळाले नाही. त्यांच्या वाट्याला प्रगतीऐवजी यातनाच आल्या. परंतु आज तेथील जनतेला या सर्व त्रासापासून मुक्ती हवी आहे. याच कारणामुळे सिंध प्रांतातील लोकांची पाकिस्तानपासून वेगळे होण्याची इच्छा आता प्रबळ झाली आहे. आपल्याला पाकिस्तानपासून वेगळे केले जावे अशी तेथील लोकांची मागणी आहे. त्यासाठी एक मोठे आंदोलन उभे राहिले आहे. हजारो-लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यांवर, बाजारांत, गल्ली-मोहल्ल्यात निदर्शने करीत आहेत. सर्वजण एकसुरात इम्रान खान सरकारला आव्हान देत आहेत. विद्रोहाच्या ज्वाळा पाहिल्यास असे वाटते की, पाकिस्तान पुन्हा एकदा फाळणीच्या उंबरठ्याशी पोहोचला आहे. बंगाल प्रांतातील लोकांनी ज्याप्रमाणे पाकिस्तानपासून अलग होऊन स्वतंत्र बांगलादेशची मागणी एकेकाळी केली होती आणि भारताच्या मदतीने ती पूर्ण झाली होती, अगदी त्याच धर्तीवर सिंध प्रांतातील रहिवासीही स्वतःसाठी स्वतंत्र सिंध देशाची मागणी करू लागले आहेत.
वेगळ्या सिंध देशाची मागणी तसे पाहायला गेल्यास अनेक वर्षांपूर्वीची आहे. परंतु गेल्या काही दिवसांत या मागणीने जोर पकडला आहे. 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर लगेचच सिंध मुलूख स्वतंत्र करण्याची मागणी प्रथम उफाळून आली होती. तेव्हापासून काही राष्ट्रवादी पक्षांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. परंतु पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांनी कधी या लोकांकडे लक्ष दिलेले नाही. गेल्या रविवारी पाकिस्तानातील राष्ट्रवादी नेते जी. एम. सईद यांच्या जयंतीनिमित्त सिंधवासीयांनी प्रचंड निदर्शने आणि घोषणाबाजी केली. “आम्हाला स्वतंत्र करा; अन्यथा परिणाम वाईट होतील,’ असा त्यांनी सरकारला अल्टिमेटमही दिला. या प्रांतातील रहिवासी खुलेपणाने सरकारला आव्हान देत आहेत. सिंध प्रांतात सामान्यतः पंजाबी, ख्रिश्चन, हिंदू आणि मुस्लीम अशी संमिश्र लोकसंख्या आहे. अनेक वर्षे सरकारने या प्रांतातील लोकांविषयी पक्षपाती धोरण स्वीकारले हे खरेच आहे. काही दिवसांपूर्वी इम्रान खान सरकारने लष्कराचा वापर करून या लोकांवर जुलूमही केले. हे जुलूम केवळ पाकिस्तानी लोकांनीच पाहिले असे नाही तर संपूर्ण जगात पाकिस्तानची नाचक्की झाली.
सिंध प्रांतात लष्कर आणि पोलीस एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे आणि एकमेकांचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दृश्यही सर्वांनी पाहिले आहे. पोलीस सिंध प्रांतातील लोकांच्या बाजूने रस्त्यावर उतरले होते तर लष्कर त्यांच्या विरोधात होते. वस्तुतः हे तेथील लोकांवर होत असलेल्या जुलमांचे प्रमाण किती अधिक आहे याचे केवळ एक द्योतक होते. याच जुलमांपासून सिंधी लोकांना आता मुक्ती हवी आहे आणि म्हणूनच स्वतंत्र देशाची मागणी करून ते रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानात हिंदू, ख्रिश्चन आणि पंजाबी लोकांच्या मूलभूत अधिकारांवर कशी गदा आणली जाते, हे सांगण्याची गरज नसावी. येथील लोक वर्षानुवर्षे पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांचे जुलूम सहन करीत आले आहेत.
इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रारंभापासूनच त्यांच्यावर दबाव आणला गेला. भीतीपोटी काहींनी इस्लाम धर्म स्वीकारलाही. पाकिस्तानातील अन्य शहरांत अशा प्रकारच्या घटना सातत्याने होतात आणि त्यात काही विशेष मानले जात नाही. कराचीत काही दिवसांपूर्वी कट्टरपंथीयांनी प्राचीन मंदिर उद्ध्वस्त केले. जेव्हा हे प्रकरण तापू लागले तेव्हा सरकारने काही लोकांवर कारवाई केल्याचा देखावा केला. हिंदू मुलींशी जबरदस्तीने विवाह करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जाते, ही गोष्टही लपून राहिलेली नाही. जागतिक स्तरावर या गोष्टी सातत्याने चर्चिल्या जात आहेत. परंतु एकदा चर्चा सुरू होते आणि काही दिवसांनी सर्वकाही थंड होते, असाच अनुभव आहे.
पाकिस्तानसाठी सिंध प्रांत का महत्त्वाचा आहे, हेही या निमित्ताने समजून घेणे गरजेचे आहे. वस्तुतः संपूर्ण सिंध प्रांत नैसर्गिक देणग्यांनी परिपूर्ण आहे. सर्व पिके उत्तम येतात. त्याचबरोबर जडीबुटी, नैसर्गिक औषधे, सुका मेवा आदींसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. त्यामुळेच हा भाग पाकिस्तानच्या अन्य भागांच्या तुलनेत कितीतरी अधिक सधन आहे. या भागातील संस्कृती पाकिस्तानपेक्षा भारतीय संस्कृतीशी अधिक मिळतीजुळती आहे. सिंध प्रांत एकेकाळी वैदिक संस्कृतीचे प्रमुख केंद्रही होता. या प्रांताचा इतिहास सोनेरी आहे. परंतु कट्टरपंथीयांनी तो बिघडवून टाकला.
प्रांताचा चेहरामोहराच बदलून टाकला. खुनाखुनी आणि रक्तपात हीच सिंध प्रांताची ओळख बनवून टाकली. लोकांना जिणे नकोसे करून टाकले. इतिहासात डोकावले असता असे दिसून येते की, या भागावर कधी काळी इंग्रजांचा कब्जा होता. 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याचवेळी पाकिस्तानही अस्तित्वात आला. जाता-जाता ब्रिटिशांनी सिंध प्रांत पाकिस्तानच्या हवाली केला. सिंध प्रांतातील नागरिक याच चुकीची शिक्षा आजही भोगत आहेत. इस्लामाबादमध्ये बसलेले पाकिस्तानचे सरकार सिंध प्रांताकडे नेहमीच उपेक्षेच्या नजरेने पाहते. मानवी पैलू, मनुष्यबळ, व्यवस्थापन, हक्क या सर्व गोष्टी मानवद्रोही शक्तींच्या टाचेखाली राहिल्या. नैसर्गिकरीत्या समृद्ध असलेला हा भाग उजाड केला.
गेल्या आठवडाभरापासून सिंध प्रांतातील सान विभागात हजारो नागरिक वेगळ्या राष्ट्राची मागणी करून आंदोलन करीत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील अन्य शक्तिशाली नेत्यांनी याप्रश्नी हस्तक्षेप करावा अशी मागणी ते करीत आहेत. मोठे आंदोलन पाहून तेथील सरकारचाही श्वास अडकला आहे. कारण घरात लागलेल्या आगीची धग सीमेपलीकडेही पोहोचली आहे. भारताने खुलेपणाने आंदोलकांची बाजू घेतली तर काय होईल, याचीही पाकिस्तानला भीती वाटत आहे. परंतु तसे झाल्यास परिणाम काय असेल हे इम्रान खान यांना चांगलेच ठाऊक आहे.
काश्मीरचा प्रश्न असो, पाकव्याप्त काश्मीर असो, बलुचिस्तान असो आणि आता सिंध प्रांत या सर्वच प्रांतांमधील नागरिक पाकिस्तानवर नाराज असून, स्वतंत्र देशाची मागणी सर्वच ठिकाणाहून होत आहे. त्यामुळे पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी इम्रान खान यांना घेरले आहे. लवचिक धोरण अवलंबून इम्रान यांनी काश्मीर भारताला विकला असून, आता पाकव्याप्त काश्मीर आणि सिंध प्रांतच उरला आहे आणि इम्रान त्याचाही सौदा करतील, असा आरोप तेथील विरोधी पक्ष करीत आहेत. एकंदरीत, पाकिस्तानी सरकार सध्या अंतर्गत समस्यांनी बेजार झाले आहे. या समस्याही इतक्या गंभीर आहेत, की त्यातून बाहेर पडणे इम्रान खान यांच्यासाठी खूपच आव्हानात्मक ठरणार आहे.
– अभय कुलकर्णी