नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानने आता त्यांच्या देशातील नद्यांच्या पुराचे पाणी भारतात सोडले आहे. पुराच्या पाण्यामुळे देशातील पंजाबमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सतलज नदीच्या पाणलोट क्षेत्रातील एका बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेल्यानंतर पंजाबच्या सीमेवरील फिरोझपूर जिल्ह्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे.
फिरोझपूर जिल्हा प्रशासनाला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, काही खेडयांना पुराचा असलेला गंभीर धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि लष्करांच्या चमूंना खबरदारीचा उपाय म्हणून तैनात करण्यात आले आहे. पाकिस्तानने फार मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे तेंडीवाला खेडयातील बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, काही खेड्यांमध्ये पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे, असे पंजाब सरकारच्या एका प्रवक्त्याने सांगितले.