इस्लामाबाद – जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांत दहशतवाद्यांसोबत जोरदार चकमकी झाल्या. या चकमकीमध्ये भारतीय सुरक्षा दलाचे आठ जवान शहीद झाले. जवान शहीद झाल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने दहशतवादाला जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. भारताने दिलेल्या या इशाऱ्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची भीती जाणवू लागली आहे.
हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्करप्रमुख मुकुंद मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पाठबळ देणे सुरू असेपर्यंत आम्ही कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे आणि दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात भारताने वर्ष 2018 मध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि मागील वर्षी एअर स्ट्राईक करीत दहशतवाद्यांचे तळ उद्वस्त केले होते. त्यानंतर आता हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर रियाज नायकूला टिपले आहे. या चकमकीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या संभाव्य कारवाईची धास्ती घेतली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक ट्विट करत भारतविरोधी सूर आवळला आहे. दक्षिण आशियातील शांतता भारतामुळे धोक्यात येण्याआधी आंतरराष्ट्रीय समुदायाने कारवाई करण्याची मागणी त्यांनी ट्विटरवर केली. काश्मीरमध्ये नुकत्याच घडलेल्या घटना या स्थानिक असल्याचा दावा इम्रान यांनी केला असून, पाकिस्तानचा यामध्ये कोणताही सहभाग नसल्याचे सांगितले.