इस्लामाबाद – भारताने 1974 साली पहिली अणू चाचणी केली. त्यानंतर सातच वर्षात पाकिस्तानही अण्वस्त्रधारी देश झाला आहे ही पाकिस्तानची मोठी कर्तबगारी आहे असे त्या देशाचे अध्यक्ष अरिफ अल्वी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानन अण्वस्त्रधारी झाल्याची अधिकृत घोषणा 1998 साली करण्यात आली होती त्याच्याही खूप आधीच पाकिस्तान अण्वस्त्रधारी राष्ट्र झाले होते असेही त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमीत्त अध्यक्षीय प्रासादात झालेल्या ध्वजारोहणानंतर अल्वी यांनी केलेल्या भाषणात हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की स्वातंत्र्याच्या 74 वर्षांमध्ये आमच्यावर तीन युद्धे लादली गेली. पण ही आव्हाने उभी राहिली तरी देश उभारणी सुरूच राहिली आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
ते म्हणाले की गेल्या 74 वर्षांमध्ये पाकिस्तानने अनेक दृष्ट्या प्रगती केली. त्यात देशाला अण्वस्त्रधारी बनवणे हे एक मुख्य साध्य ठरले आहे असा दावाहीं त्यांनी केला आहे.
आपल्या देशाच्या उपखंडात तीव्र शस्त्र स्पर्धा निर्माण झाली आहे असेही त्यांनी नमूद केले. पाकिस्तानने कृषी क्षेत्रात स्वयंपुर्णता गाठली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आता पाकिस्तान हे औद्योगिकीकरण झालेले राष्ट्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
देशाला दहशतवादाचा मोठा धोका आहे असे नमूद करून ते म्हणाले की, या दहशतवादाच्या घटकाचाही देशाने धैर्याने मुकाबला केला आहे. दहशतवादामुळे किमान एक लाख जीव आपण गमावले आणि सुमारे 150 अब्ज डॉलर्सचे नुकसान आपण सोसले पण तरीही यातून आपण विजयी झालो आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानातून साडे तीन लाख निर्वासित आपल्या देशात आले आहेत परंतु तरीही आपण त्यांना उदार मनाने आश्रय दिला आहे असेही अध्यक्षांनी यावेळी नमूद केले.
यावेळी त्यांनी काश्मीरच्या प्रश्नाचाही उल्लेख केला. काश्मीरींच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे असेही त्यांनी सांगितले.