बळीराजाच्या मनात चिंतेचे ढग : बहुसंख्य शेतकऱ्यांकडे नाही सिंचनाची सोय
पवनानगर – निसर्ग चक्रीवादळामुळे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडला. त्यामुळे मावळासह महाराष्ट्रातील शेतकरी यावर्षी पावसाळा लवकर आल्याने मोठा आनंदी होता. परंतु वादळ गेले आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातून पावसदेखील हद्दपार झाला. त्यामुळे मावळात भातलावणी रखडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात मोठे चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.
पवनमावळसह मावळतालुक्यात पावसाने सुरवातीला हजेरी लावली होती. त्यामुळे ओढे, नदी, नाले ही भरून वाहत होते. बळीराजाही सुखावला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातपेरणी केली होती. या पावसामुळे भातरोपेही चांगली उगवून आली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध आहे आशा शेतकऱ्यांनी भातलावणी सुरू केली आहे. तर काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. दररोज कडाक्याचे ऊन पडत आहे. दिवसभर उकाडा वाढला आहे. परंतु पावस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळून गेले आहे. यामुळे शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे.
शेतात भातरोपे खनण्यासाठी व भातरोपे लावण्यासाठी पाणी नसल्यामुळे भातलावणी लांबवणीवर पडली आहे. शेतकरी आता चांगल्या व दमदार पावसाची वाट पाहत आहे. डोंगरभागात जर पाऊस लवकर नाही पडला तर भातरोपे पाण्याअभावी करपून जाण्याची शक्याता आहे. तयार भाररोपे लवकर लावली नाहीत ती रोपे वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी येत आहे.
शेतकऱ्यांचे डोळे ढगाकडे
रात्रंदिवस शेतकऱ्याला एकच चिंता आहे. पाऊस कधी येईल. चातक पक्ष्याप्रमाणे शेतकरी अभाळाकडे पाहत आहे. करोनामुळे आधीच मोठे नुकसान झाले आहे. सर्व अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीमध्ये निसर्गाने साथ दिली नाही तर यावर्षी उदरनिर्वाह कसा होणार याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. भोतरोपे तयार आहेत परंतु पावसाअभावी लागवड करणे शक्य नसल्याने शेतकरी हातबल होऊन ढगांकडे पाहत पावसाची वाट पाहत आहे.