मुंबई – चिनी घुसखोरीचे राजकारण करू नये, हे पवारांचं म्हणणे अगदी बरोबर आहे. भाजप पुरस्कृत समाजमाध्यमांकडून पवारांचा हा टोला काँग्रेसला असल्याचं बोललं जात आहे. मात्र पवारांचा हा टोला सरकारी पक्षालाही तितकाचं लागू पडतो, असं म्हणत आजच्या आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून भाजप पक्षावर निशाणा साधत ‘चीनशी कोणी लढायचे?’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख
हमाम मे सब नंगेच आहेत! पण सध्या प्रश्न आहे तो चीनबरोबर लढण्याचा. गलवान खोऱ्यात चीनकडून नव्याने बांधकाम सुरू झाले आहे. अरुणाचल, सिक्कीम मार्गाने त्यांचे सैन्य धडक मारत आहे. त्यामुळे राजकीय साठमारी बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. काँगेस पक्षाशी भाजपला नंतर केव्हाही लढता येईल. आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला!
चीनने माघार घेतली व दोन देशांतील सैन्य कमांडरांमध्ये चर्चा होऊन तणाव निवळला हे जे रोज सांगितले जात होते त्यातला फोलपणा समोर आला आहे. लडाख व चीनच्या सीमेवर तणाव कायम असून हिंदुस्थानची डोकेदुखी वाढेल अशा हालचाली चीन करत आहे. बोलायचे एक आणि करायचे दुसरेच हे चीनचे राष्ट्रीय धोरण असावे. चीनला युद्ध नको आहे, पण सीमेवर युद्धासारखी परिस्थिती निर्माण करून हिंदुस्थानला स्वस्थता लाभू द्यायची नाही, असे त्यांचे धोरण आहे. गलवान खोऱयातून आपले सैनिक व वाहने मागे घेण्याची तयारी चीनने दाखवली. पण त्याच वेळी चिनी लष्कराने लडाखच्या डेपसांग सेक्टरमध्ये नवे तंबू ठोकले. तोफा, रणगाडे आणले. लष्कर वाढवले. चीनची हेलिकॉप्टर तेथे उतरू लागली.