5,300 कुटुंबांना मिळणर 5.5 लाख रुपये
नवी दिल्ली- पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून आलेल्या 5,300 विस्थापित कुटुंबांसाठीच्या पुनर्वसन पॅकेजला केंद्र सरकारने बुधवारी मंजुरी दिली. या पॅकेज अंतर्गत प्रारंभी जम्मू-काश्मीरच्या बाहेर स्थायिक झालेल्या व नंतर राज्यात परत हलविलेल्या प्रत्येकाला 5.5 लाख रुपये दिले जातील. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
या योजनेंतर्गत या कुटुंबीयांना 5.5 लाख रुपयांची एक-वेळची आर्थिक मदत मिळेल आणि त्यामधून काही स्थिर उत्पन्न मिळू शकेल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील 1947 मध्ये विस्थापित झालेल्या कुटुंबांना सामावून घेण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
जम्मू-काश्मीरसाठी 2015 साली पंतप्रधानांनी दिलेल्या विकास पॅकेज अंतर्गत पाकिस्तानच्या जम्मू-काश्मीर (पीओजेके) आणि छंबच्या विस्थापित कुटुंबांच्या 30 नोव्हेंबर 2015 रोजी मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या पॅकेजमधून ही कुटुंबे वगळली गेली होती. जम्मू-काश्मीरमध्ये 1947 च्या पाकिस्तानच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, “पीओजेके’मधून जम्मू-काश्मीरमध्ये 31,619 कुटुंबे स्थलांतरित झाली होती.
यातील 26,319 कुटुंबे जम्मू-काश्मीरमध्ये स्थायिक झाली आहेत आणि 5,300 कुटुंबे प्रारंभी देशाच्या इतर भागात गेली. पुढे 1965 आणि 1971 च्या भारत-पाक युद्धांमध्ये छंब-निआबात भागातून एकूण 10,065 कुटुंबे विस्थापित झाली होती. प्रारंभी जम्मू-काश्मीरमधून बाहेर पडलेल्या “पीओजेके’च्या 5,300 विस्थापित कुटुंबांना 2016 मध्ये मंजूर पॅकेजमध्ये समाविष्ट केले नव्हते. परंतु आता त्यांचा समावेश करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.