नवी दिल्ली :- रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्याच्या एका महिन्यात एकूण 3.62 लाख कोटी रुपयांपैकी दोन तृतीयांश रक्कम काढून घेतली जाईल. त्यापैकी 2.41 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या नोटा बॅंकांकडे परतल्या आहेत. याचा अर्थ व्यवहारातील दोन तृतीयांश नोटा बॅंकांमध्ये परत आल्या आहेत.
आता चलनातून परत आलेल्या 2000 रुपयांच्या नोटेचा अर्थव्यवस्थेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. मध्यवर्ती बॅंकेने 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. यासोबतच लोकांना त्यांच्या बॅंक खात्यात 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा इतर मूल्यांच्या नोटांसाठी बदलण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मार्च 2023 मधील मूल्यानुसार एकूण 3.62 लाख कोटी रुपयांच्या नोटा 2,000 रुपयांच्या होत्या.
याआधी, 8 जून रोजी चलनविषयक धोरण पुनरावलोकनानंतर, गव्हर्नर दास म्हणाले होते की, त्यावेळी 1.8 लाख कोटी रुपयांच्या 2,000 रुपयांच्या नोटा परत आल्या होत्या. चलनात असलेल्या एकूण 2,000 रुपयांच्या नोटांपैकी हे प्रमाण सुमारे 50 टक्के होते. यापैकी, अंदाजे 85 टक्के बॅंकेत जमा केले गेले आहेत, तर उर्वरित इतर मूल्यांच्या नोटांसाठी (2000 रुपयाची नोट एक्सचेंज) बदलण्यात आले आहेत.
पुढे, 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाबाबत विचारले असता ते म्हणाले, “मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकतो की, आता ज्या 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या जात आहेत, त्याचा अर्थव्यवस्थेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
अलीकडेच, एसबीआय रिसर्चच्या अहवालात असे म्हटले आहे की भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून 2,000 रुपयांची नोट काढून घेतल्याने वापराला गती मिळू शकते आणि यामुळे चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 6.5 टक्क्यांपेक्षा जास्त राहू शकतो. अहवालानुसार, आम्ही 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे एप्रिल-जून तिमाहीत विकास दर 8.1 टक्के राहण्याची अपेक्षा करतो. 2023-24 या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा रिझर्व्ह बॅंकेचा अंदाज 6.5 टक्क्यांहून अधिक असण्याची यावरून पुष्टी होते.