नवी दिल्ली :- ‘आप’च्या नेतृत्वाखालील पंजाब सरकार राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केला आहे. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी त्यांना सध्या मणिपुर जळत असून केंद्र सरकारने आणि भाजपच्या राज्य सरकारने तिकडे अधिक लक्ष दिले पाहिजे अशी सुचना त्यांना केली आहे.
चढ्ढा म्हणाले की, राजनाथ सिंह यांना पंजाबबद्दल चुकीची माहिती मिळाली आहे. पंजाबमध्ये भगवंत मान सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारली आहे. गेल्या काही दशकांच्या तुलनेत सध्या पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती खूपच चांगली आहे,असे त्यांनी म्हटले आहे.
राजनाथसिंह यांनी पंजाब मधील स्थितीबाबत बोलण्या आधी मणिपुरमधील स्थितीकडे लक्ष दिले पाहिजे. ते म्हणाले की, मी संरक्षण मंत्र्यांना विनंती करतो की मणिपूर जळत आहे, लाखो लोक बेघर झाले आहेत आणि असंख्य लोक मरण पावले आहेत. त्यामुळे इतर राज्यांकडे लक्ष वेधण्यापूर्वी प्रथम तेथील हिंसाचाराची जबाबदारी घ्या,असे ते म्हणाले.
दिल्लीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. पण तेथील स्थिती सुधारण्यातही भाजप सरकारला अपयश आले आहे. येथे दररोज खून, बलात्कार आणि दरोडे पडतात. दिल्लीत गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे असे ते म्हणाले.