पुणे -सातबारा उताऱ्यावरील खरेदीच्या नोंदी व वारसनोंदीचे फेरफार जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याचे प्रकार काही तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडून घडत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात मागील पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या फेरफारांची संख्या सुमारे अडीच हजार इतकी आहे. या फेरफारांवर कोणत्याच प्रकारचे निर्णय घेतला नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असून फेरफार प्रलंबित ठेवल्याप्रकरणी जिल्ह्यातील पाच तलाठ्यांना नोटीस बजावली आहे.
जमिन खरेदी-विक्रीचा दस्त नोंदविल्यानंतर अथवा सातबारा उताऱ्यावरील खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर वारसनोंदीसाठी तलाठी यांच्याकडे अर्ज करण्यात येतो. त्यानुसार तलाठी त्याची नोंद ई-फेरफार प्रणालीमध्ये करून मान्यतेसाठी मंडल अधिकारी यांच्याकडे ऑनलाइन प्रणालीद्वारे पाठविला जातो. हे फेरफार मंजूर करणे अथवा नाकारणे असा निर्णय एक महिन्याच्या आत घेणे आवश्यक आहे. मात्र काही तलाठ्यांनी फेरफार नोंद न घेणे अथवा मंडल अधिकारी यांच्याकडून जाणीवपूर्वक फेरफार प्रलंबित ठेवण्याचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रलंबित फेरफार निकाली काढण्यासाठी तालुका स्तरावर शिबिर घेऊन फेरफार नोंदी निकाली काढण्याच्या सूचना तहसिलदार यांना दिल्या आहेत.
सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण पूर्ण करुन ई-फेरफार प्रणाली 2018-19 या वर्षापासून अंमलात आणली आहे. ई-फेरफार प्रणालीमध्ये कामकाजावर देखरेख ठेवण्याच्या दृष्टिने फेरफार नोंदीची प्रलंबिता दिसण्यासाठी माहिती व्यवस्थापन प्रणाली (एमआयएस) ई-फेरफारच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीमुळे तालुकानिहाय किती फेरफार प्रलंबित आहेत, याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामध्ये किती फेरफार कधीपासून प्रलंबित आहेत, याची माहिती समोर आली आहे.
अधिकाऱ्यांची चालढकल
तलाठी यांच्याकडील नोंद डॅशबोर्डवर येऊनही त्याचा फेरफार न घेणे, फेरफार घेतल्यास मुदतीत नोटीस न काढणे, नोटीस काढली असल्यास ती न बजावणे, नोटीस बजावल्यास असल्याच मंडल अधिकारी यांच्याकडून ती विहित मुदतीत निर्गत न करणे या सर्व प्रकारांमुळे फेरफार प्रलंबित राहत असल्याचे समोर आले आहे.
सातबारा उताऱ्यावरील फेरफार प्रलंबित राहू नये, त्यावर योग्य तो निर्णय घेऊन तो निकाली काढणे आवश्यक आहे. यासाठी तालुकास्तरावर विशेष शिबिर घेऊन प्रलंबित फेरफार निकाली काढण्याच्या सूचना तहसिलदार यांना दिल्या आहेत.
– डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे