पुणे -प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात पुण्यातील चार नृत्य समूहांना सादरीकरणाची संधी देण्यात आली आहे. हे चारही समूह कथक या शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. टांझ कथक अकॅडमी, मनीषा नृत्यालय, अभिव्यक्ती स्कूल ऑफ कथक यासह उस्ताद जाफर मुल्ला खान आणि अविनाश बेलसरे यांचे शिष्य पथसंचलनात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, दिल्ली येथील अंतिम फेरी अशा देशभरातून घेतलेल्या विविध पातळीवर निवड प्रक्रियेतून नृत्य समूहातील नृत्य कलाकारांची निवड झाली आहे. “वंदे भारतम’यास्पर्धेतील सर्व फेऱ्या पूर्ण करत विजयी झाल्यानंतर या नृत्य समूहांना ही संधी मिळाली आहे.
टांझ कथक अकॅडमीचे पथसंचलनात सादरीकरणाचे हे दुसरे वर्ष असून, यंदा सई गोखले, मृणाल वैद्य, अनुशा बावणकर, रमणी भालेराव, आर्वी बेंद्रे, ईशा रानडे आदी विद्यार्थिनी सादरीकरण करतील. तर मनीषा नृत्यालयातील मधुरा आफळे, वैष्णवी निंबाळकर, चैत्राली उत्तुरकर, कीर्ती कुरंडे, मैथिली पुंडलिक, आयुषी डोबारिया आदी विद्यार्थिनी तर अभिव्यक्ती स्कूल ऑफ कथक ग्रुपमधील अदिती फडके, मधुरा इनामदार, अपूर्वा मुळ्ये, समृद्धी लेले, साक्षी जोशी, स्वरूपा भोंदे, हिमांशी झंवर आदी विद्यार्थिनींचा सहभाग असेल.
मी गेल्या वर्षी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली होती. तो अनुभव खूप छान होता. यंदा पथसंचलनात पुण्यातील चार समूह सादरीकरण करणार आहेत. “नारी शक्ती’ ही कार्यक्रमाची संकल्पना असणार आहे. पंचतत्त्वामधून ते नारी शक्तीचा संदेश देणार आहेत. चारही समूहातील विद्यार्थिनी मोठ्या मेहनतीने सराव करत आहेत. – तेजस्विनी साठे, नृत्य दिग्दर्शिका