लखनौ – लखीमपूर खेरा येथे भाजपा मंत्र्यांची मोटार आंदोलक शेतकऱ्यांच्या जमावात घुसल्याने चार जण मरण पावले. त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रियांका गांधी यांनी सोमवारी उपोषणास सुरवात केली.
दरम्यान, समाजवादी पक्षचो नेते अखिलेश यादव यांसह सर्व पक्षीय नेत्यांनी लखीमपूरला धाव घेण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले. राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठिकठिकाणी निमलष्करी दलांसह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात पंजाब आणि हरियाणातून शेतकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे येत असून त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार पुढील आव्हान वाढले आहे.
आजच्या घटनेने भारतीय जनता पक्षाचे राजकारण शेतकऱ्यांना झुकवण्यासाठी कसे सुरू आहे, हे दर्शवले आहे. हा देश शेतकऱ्यांचा आहे… भाजपाचा नाही. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना भेटायला जाऊन मी कोणताही गुन्हा केला नाही… आम्हाला का तुम्ही थांबवत आहात? तुमच्याकड वॉरंट आहे का? असे सवाल करत प्रियांका गांधी यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर योगी सरकारला धारेवर धरले.
लखनौमधील निवासस्थानाबहेर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. लखीमपूर जिल्ह्याला भेट देण्यापासून त्यांना रोखल्यानंतर त्यांनी जागीच ठिय्या मांडला. उत्तर प्रदेशमधील सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांनी निदर्शने सुरू केली आहेत.
केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांचा लखीमपूर घटनेपुर्वीचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत आहे. त्यात ते आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन मिनिटांत सरळ करतो, अशी भाषा वापरत आहेत. हा व्हिडिओ लखीमपूर हिंसाचाराच्या आधीचा आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोमवारी भारतीय जनता पक्षावर या हिंसाचारावरून जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या पराकोटीच्या अन्यायात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यापासून रोखण्याचे भारतीय जनता पक्षाला कोणतेही कारण नाही. त्यामुळे लोकशाही मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा मी कडाडून निषेध करतो, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम येचुरी म्हणाले.
शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी यांनी पक्षाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ प्रेमसिंग चंदुमजरा यांच्या नेतृत्वाखाली पाटवण्याची घोषणा केली. त्यांनी या घटनेच्या नि:पक्ष चौकशीची मागणी केली.
पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा यांना लखनौ विमानतळावरून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. त्यानंतर ते पुन्हा अमृतसरहून रस्ता मार्गे निघाले आहेत. योगी सरकारने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनाही उत्तर प्रदेशात येण्यास मनाई केली आहे.
पंजाबात संतापाची तीव्र लाट
लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या बातमीचे मृत्यूची बातमी समजताच पंजाबमध्ये संतापाची तीव्र लाट उमटली. शेतकऱ्यांचे छोटे छोटे जथ्थे उत्तर प्रदेशच्या दिशेने रवाना होत आहेत. रुल्डूसिंग मानसा, बुटासिंग बुजगील, रामिंदरसिंग आदी शेतकरी नेते आपल्या सहकाऱ्यांसमवेत उत्तर प्रदेशकडे रवाना झाले आहेत. मात्र, त्यांना उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. अजय मिश्रा यांच्या अटकेच्या मागणीसाठी नवज्योतसिंह सिध्दू यांनी चंदिगढमध्ये राज्यपाल निवासस्थानाबाहेर निदर्शने सुरू केली.
सीबीआय चौकशी करा
या प्रकरणाची सीबीआय, विशेष पथक किंवा कार्यरत न्यायाधिशांमार्फत चौकशी करावी. या हिंसाचारात मरण पावलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत द्यावी. दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी लखीमपूर हिंसाचारास कारणीभुत ठरल्याचा आरोप होत असणाऱ्या केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी केली.