मुंबई – शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर आजी-माजी नगरसेवकांनी शिवसेनेला रामराम ठोकून शिंदे गटाशी हात मिळवणी केली. आता 12 खासदारांनीही शिवसेनेचा हात सोडला आहे. त्यामुळे बंडाळीने ग्रस्त शिवसेनेला सावरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यांच्याकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसह मेळावे घेतले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना भवनमध्ये उत्तर भारतीय एकता मंच आणि शिवसेना व्यापारी संघटनेची बैठक झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. शिवसेनेत फुट बंडखोरांनी नव्हे तर भाजपने पाडली असल्याचा आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपच शिवसेना संपवत आहे. भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे. त्यातील एक कोंबडा मेला की दुसऱ्या कोंबड्याला जेलमध्ये टाकतील. अशाप्रकारे त्यांची इच्छा पूर्ण होईल”. उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरु असून, सतर्क राहा, अशी सूचनाही केली. तसंच माझ्या भात्यामधील कितीही बाण न्या, पण ते चालवण्यासाठी लागणारं धनुष्य माझ्याकडे आहे, असेही म्हटले आहे.
भाजप विचारांवर विश्वास ठेवणारा पक्ष : मुनगंटीवार
“कधी रेडे, कधी कोंबडे असतात. कोणी झुंज लावली याचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे. तुमच्या मनात खुर्चीचं प्रेम कोणी जागवलं? कोण शकुनी आहे? की चांगल्या युतीत खडा टाकला याचा विचार केला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मुनगंटीवार म्हणाले, “भाजपला कधीच दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावण्याचं काम करावं लागत नाही. भाजप विचारांवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. कधी अमित शाह, कधी राजनाथ सिंह यांचं नाव घ्याचयं, गुवाहाटीमधील आमदार संपर्कात असल्याचं दावा करायचा, पण हे सर्व खोटं होतं, आता नवीन अफवा पसरवत आहेत,” असा आरोप त्यांनी केला आहे.