कोल्हापूर : कोल्हापूरात चीन विरोधात मोठा उद्रेक आज पाहायला मिळाला. कोल्हापूरच्या उत्तरेश्वर पेठेतील नागरिकांनी चायनीज वस्तूची प्रेत यात्रा काढत वस्तूंची तोडफोड करत होळी केली. कोल्हापूरच्या गंगावेश चौकात अशा पद्धतीने चीन विरोधात जनाक्रोष पाहायला मिळाला.
भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहिद झाले. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी चिनी वस्तूंची तोडफोड करून तसेच जाळपोळ करून चिनी वस्तुंना हद्दपार करण्याचा निश्चय केला गेला. जो तो आपापल्या परीने चीन चा विरोध दर्शवतो आहे.
याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या गंगावेश चौकात देखील मोठे LED टीव्ही , कॉम्प्युटर, लाईटच्या माळा, घड्याळ सह इतर चायनीज वस्तूंची तोडफोड करून चिनी माल होळी करून पेटवला. त्यामुळे होळीच्या धुराचे लोट लांबपर्यंत दिसत होते. भर पावसात कोल्हापूरच्या नागरिकांनी हे आंदोलन केले आहे. यावेळी चीन विरोधात घोषणा दिल्या असून भारत माता की जय असा नारा दिला.