शेवगाव – सायब, रातच्या येळी लायटी जात्यात, राशनवर घासलेट मिळत होतं तेबी बंद झाल्याल. अशा येळी अभ्यास सोडून झोपावं लागतं. तवा कायम लाईटी राहत्याल अशी कायतरी यवस्था करावी. तालुक्याच्या पूर्व भागातील शेकटे या छोट्याशा खेड्यातील बालसभेत अशी मागणी एका तिसरीच्या चिमुरड्या बालकाने केली आहे.
गावासाठी अक्षय प्रकाश योजनेची मागणीच त्याने त्याच्या शब्दात उत्स्फूर्तपणे मांडली. ग्रामसभांमध्ये सध्या झालेल्या आमूलाग्र बदलाचा हा परिपाक आहे. शेवगाव तालुक्यातील आठ गणातील 94 ग्रामपंचायतीपैकी आज अखेर 54 पंचायतीच्या ग्रामसभा उरकल्या आहेत.
आमचा गाव आमचा विकास अभियानांतर्गत सध्या सर्वत्र ग्रामसभांचा सिलसिला जोरात सुरू आहे. यापूर्वी मतदार असलेल्या व्यक्तींची ग्रामसभा व्हायची. आता आमचा गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत पंचवार्षिक ग्रामविकास आराखड्याचे नियोजन चालू आहे. प्रत्येक गावात सलग तीन दिवस या वेगवेगळ्या सभांचे आयोजन करण्यात आले.
पहिल्या दिवशी रात्रीच्या वेळी मशाल फेरी काढून दवंडी देऊन ग्रामसभाबाबत जागरुकता केली जाते. या अनोख्या बदलाने ग्रामसभेबाबत कुतूहल निर्माण होवून केवळ ग्रामसभेचा कोरम पूर्ण करायचा म्हणून ग्रामस्थांना बळेच बोलावून आणायचे प्रकारही बंद होत आहेत. दुसऱ्या दिवशी वंचित घटकांची व महिलांची सभा घेतली जाते. बालसभा शाळांच्या प्रांगणात तर महिला वंचितांच्या सभा त्यांच्या सोयीच्या ठिकाणी घेतल्या जातात. तिसऱ्या दिवशी सर्व ग्रामस्थांचा एकत्रित सहभाग असलेली ग्रामसभा घेतली जाते.
या शेवटच्या ग्रामसभे अगोदर किंवा नंतर सोयीनुसार कृषी अधिकाऱ्यांच्या समवेत शिवारफेरी काढली जाते. या फेरीत केटीवेअर बंधाऱ्याच्या उपलब्ध साईट पाहिल्या जातात. पूर्वीपेक्षा वेगळ्या ढंगात घेतल्या जाणाऱ्या या ग्रामसभामुळे विषयांची व्यापकता वाढली आहे. बाल सभात अंगणवाडीमधील बालके आपल्या बालसुलभ मागण्या करतांना आढळतात. शेजारच्या गावाहून पायी येणाऱ्या मुलांना शाळेला उशीर होतो. म्हणून एसटी सुरू व्हावी. ओढ्याला पाणी आले तर पाण्यातून यावे लागते, कपडे भिजतात, पायाला जखम होते.
म्हणून ओढयावर पुल झाला तर बरे होईल अशी आग्रही मागणी लाडजळगाव प्राथमिक शाळेतील मुलांमुलींनी केली. तर दुसऱ्या एका मुलीने घराच्या परिसरात कचराकुंडी ठेवली जावी. तेथे डास होतात, धूर फवारणी करण्याची मागणी करून पंचायतीने फॉगींग मशीन घ्यावी अशी सुचनाच केली आहे. गोळेगाव या अत्यंत दुर्गम डोंगर भागातील बालसभेत एका मुलीने मोठ्यांना अंतर्मुख करायला लागेल अशी सूचना तीने मोकळ्या मनाने करून ग्रामीण भागातील विदारक सत्यच मांडले आहे.
मुली नववी दहावीत असतांनाच आमचा विवाह जमविला जातो. शिक्षण घेण्याची आमची इच्छा असते. पण आमची इच्छा कोणी विचारातच घेत नाही. आम्हाला शिकू द्यायला हवे अशी तिच्या शब्दात मागणी करून बालविवाह प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी कडकपणे व्हायला हवी हेच तिने सुचविले आहे. तरुण मुलांनी वाचनालय व्यायामशाळा संगणकाच्या सुविधा सारख्या मागण्या नोंदविल्या आहेत.
या सभांमध्ये पुढील पंचवार्षिक नियोजन तयार करून प्राधान्यक्रमानुसार विकासकामे विचारात घेतली जाणार आहेत. तसेच आराखड्याची मंजुरी पंचायत समितीच्या तांत्रिक विभागाकडून घ्यावी लागेल. आराखडयात असल्याशिवाय कामे मंजूर होणार नाहीत. आणि एकदा केलेल्या आराखडयात बदल करता येणार नाही किंवा त्या व्यतिरिक्त कामही घेता येणार नाही.