नागपूर – महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही. पण सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडे असलेली गावं घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच सांगलीच्या जतमधील गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव आता केलेला नाही तर तो 2012 मधील आहे. आपण त्या गावांना पाणी देण्यासाठी आधीच म्हैसाळच्या सुधारित योजनेत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.
नागपुरात येथे पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस बोलत होते. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. यावर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.
फडणवीस म्हणाले, आता कर्नाटकचे मुख्यमंत्री जे बोलले, ते समजून घ्या. या सीमा वादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे सीमा भागातील आपल्या लोकांना मदत करण्याचे आपण ठरवले आहे. त्यांच्यासाठी आधीच्या आणि काही नवीन योजना आपण पोहोचवत आहोत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य केले असावे.
Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला पंडित नेहरूच जबाबदार – सुधीर मुनगंटीवार
एकही गाव महाराष्ट्रातलं कुठे जाणार नाही. पण आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह जी आमची गावं आहेत ती आम्ही सर्व मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.