कोलकाता : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी पक्षनेतृत्वाने रावत यांना राजीनामा देण्यास सांगितले. रावत यांनी चार महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तीरथसिंह यांच्याप्रमाणेच ममता बॅनर्जी यांच्यावरही करोनामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते, अशी संभाव्यता वर्तविण्यात येत आहे.
तीरथ सिंह रावत विधानसभेचे सदस्य नव्हते. त्यामुळे सहा महिन्यांच्या आत त्यांना विधानसभेचे सदस्य होणे आवश्यक होते. मात्र करोनामुळे राज्यात विधानसभेची पोटनिवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे हे घटनात्मक संकट तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्याचे कारण ठरले आहे.
तीरथ सिंह रावत यांच्या पदावर आलेले घटनात्मक संकट ममता बॅनर्जीं यांचीही चिंता वाढवणारे आहे. ममता देखील विधानसभेच्या सदस्य नाहीत. करोनाच्या स्थितीमुळे पुढील काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये पोट निवडणूक झाली नाही, तर ममता यांच्यासमोर देखील तीरथ सिंह यांच्याप्रमाणे पेच निर्माण होऊ शकतो.
विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य नसताना केवळ सहा महिने मुख्यमंत्रीपदावर राहता येऊ शकतं. राज्य घटनेतील १६४ (४) मुख्यमंत्री किंवा मंत्री सहा महिन्यात राज्याच्या विधीमंडळाचा सदस्य होऊ शकला नाही, तर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतो. तीरथ सिंह यांनी १० मार्च २०२१ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. १० सप्टेबरपूर्वीच त्यांनी विधानसभेचं सदस्य होणे आवश्यक होते.
दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी ४ मे २०२१ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांना ४ नोव्हेंबरपूर्वी विधानसभा सदस्य होणे आवश्यक आहे. करोनामुळे पोटनिवडणूक होऊ शकली नाही, तर ममता यांना देखील मुख्यमंत्रीपदाचा राजानीमा द्यावा लागू शकतो.