मुंबई – उस्मानाबादचे नाव बदलून “धाराशिव’ करण्यास हरकत नाही, अशी माहिती केंद्र सरकाराने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. मात्र औरंगाबादचे नाव “छत्रपती संभाजीनगर’ करण्याची प्रक्रीया अद्याप विचाराधिन असल्याचे केंद्राने न्यायालयात म्हटले आहे. त्यामुळे, औरंगाबादचे नामांतर वेटिंगवर असल्याचे समोर आले आहे. उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर बुधवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यासमोर सुनावणी झाली.
या याचिकेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारकडून ही महत्वाची बातमी देण्यात आली आहे. आधी उद्धव ठाकरे यांच्या तर नंतर एकनाथ शिंदे- भाजप सरकारने दोन्ही शहरांच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उस्मानाबादच्या नामांतरला हिरवा कंदील मिळाला असला तरी औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याचे दिसते.
त्यापार्श्वभूमिवर आता यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादच्या नामांतराची मागणी करण्यात येत आहे. या नावासाठी कोणाकडूनही हरकत दाखविण्यात आली नसली तरी अद्यापतरी केंद्रकडून हा विषय विचारधिन असल्याचे दिसते.
महत्वाची बाब म्हणजे, केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता असताना भाजपच्या नेत्यांनीच या मागणीसाठी जोर लावून धरला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळत असताना मविआ सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर “छत्रपती संभाजीनगर’ करण्याला मान्यता दिली. पण नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-भाजप युतीच्या सरकारकडून पुन्हा एकदा नव्याने या मागणीला मान्यता देण्यात आली. ज्यामुळे राज्यात एकच जल्लोष करण्यात आला होता.
राज्य सरकारला हवा अतिरिक्त वेळ
दुसरीकडे, यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी हायकोर्टाकडे अतिरिक्त वेळ मागून घेतला. त्यांची ही विनंती मान्य करत उच्च न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी 27 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.
चित्रा वाघ यांचीही मागणी
गेल्या महिन्यात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर नाही तर धर्मवीर छत्रपती संभाजीनगर करावे, अशी मागणी केली होती. हिवाळी अधिवेशनात सभागृहात बोलतांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे वक्तव्य केले होते, ज्यामुळे वाघ यांनी औरंगाबादचे नाव “धर्मवीर छत्रपती संभाजीनगर’ करावे, असे एका सभेत म्हटले होते. तर याबाबत आपण शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी देखील करणार असल्याची माहिती चित्रा वाघ यांच्याकडून देण्यात आली होती.