शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
मुंबई: अनाथ मुलांना शाळा प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे नसल्याने अडचण निर्माण होत होती. मात्र, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी राज्यातील अनाथ मुलांना मोठा दिलासा दिला आहे. अशा अनाथ मुलांवर शाळा प्रवेशात आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबवताना अन्याय होऊ नये म्हणून अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरुन प्रवेश देण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश शेलार यांनी दिले आहेत.
अनाथ मुलांच्या शाळा प्रवेशात कागदपत्रांच्या अनेक अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः त्यांचे उत्पन्नाचे दाखले मागितले जात असत तसेच त्यांच्या नावासमोर जात व शेवटचे नाव काय लिहावे याबाबत संभ्रम होता. त्यामधे सुस्पष्टता आणणारा महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला. शासननिर्णयानुसार बालकांच्या प्रवेशाकरिता अनाथालयाची/बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नये, असे शासननिर्णयात म्हटले आहे.