तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – इंद्रायणी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागांतर्गत ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०-आव्हाने आणि संधी’ या विषयावर येत्या शनिवारी (दि. 6) एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे व कार्यवाह चंद्रकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी दिली.
राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. पहिल्या सत्राचे बीजभाषण पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व राज्य सरकारच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर करणार आहेत. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय खरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
दुसऱ्या सत्राची विभागणी ही शाखांनुसार केलेली असून, कला शाखेसाठी डॉ. प्रभाकर देसाई, वाणिज्य शाखेसाठी डॉ. यशोधन मिठारे व विज्ञान शाखेसाठी डॉ. रवींद्र क्षीरसागर हे नवीन शैक्षणिक धोरणाबाबत प्राध्यापकांना मार्गदर्शन करणार आहेत.