नारायणगाव – अलीकडच्या काळात पारंपरिक शेतीतून बाहेर पडत अनेक शेतकरी विविध प्रयोग करताना ग्रामीण भागात पाहायला मिळते. निरोगी व उत्तम आरोग्याएवढे या जगात इतर कोणतीच गोष्ट नाही ही बाब लक्षात घेऊन नारायणगाव येथील शेतकऱ्याने २१ गुंठे क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने गव्हाचे पीक घेऊन १३०० किलोचे उत्पादन निघाले आहे.
शेतकरी रामदास पंढरीनाथ काळे यांनी आपल्या २१ गुंठे क्षेत्रात ९ किलो गव्हाची पेरणी करुन सेंद्रिय पद्धतीने बॉम्बे ४७ या प्रजातीच्या गव्हाचे उत्पादन घेतले आहे. या गव्हाला ४० रुपये प्रतिकिलो दराने मिळाल्याचे त्यांनी सांगितले. गव्हाच्या पेरणीपासून गहू काढणीला येईपर्यंत एकही रासायनिक खत किंवा रासायनिक औषधांचा वापर न करता केवळ सेंद्रिय पद्धतीने गव्हाचे पीक घेतले असून आई,पत्नी यांच्यासह घरच्या घरीच या गव्हाच्या शेतीची मशागत केली आहे.
रासायनिक खते व औषधांचा वापराचा अतिरेक होऊ लागल्याने अनेक शेतकरी आता घरी खण्यापूरते का होईना सेंद्रीय शेती करत असल्याचे चित्र आता दिसत आहे. रासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीत गव्हाचे उत्पादन कमी मिळणार मात्र कोणत्याही रासायनिक खत व औषधाशिवाय घेतलेले शुद्ध अन्न म्हणून सेंद्रिय शेतीकडे पाहिले जाते.
काळे यांनी पेरणी अगोदर १ ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत शेतात घातले आहे व त्यानंतर बियाण्याची पेरणी केली आहे. पहिल्या तीन भरणीच्या वेळी त्यांनी जीवामृतचा वापर केला आहे. चौथ्या व पाचव्या भरणीला त्यांनी पी.एस.बी.व झिंकचे जिवाणू सोडले आहेत. सहाव्या व सातव्या भरणीला त्यांनी पोटॅशचे के.एम.बी. हे जिवाणू पाण्याद्वारे सोडले आहेत.
कीड नियंत्रणासाठी व पिकाचे चांगले पोषण होण्यासाठी खुरपणी नंतर सागरिका, नारळ पाणी, आले, मिरची व लसूण यांचा अर्क बनवून फवारणी केली आहे. या फवारणीमुळे कीड नियंत्रणात येऊन चांगले फुटवे निघाले. ढगाळ हवामानात वात्सल्यचे दशपर्णी अर्क फवारल्यामुळे मावा व इतर किडींचे चांगले नियंत्रण झाले.
गव्हाला साधारण ४० टक्के ओंब्या निघाल्यानंतर सागरिका, बिव्हेरिया व नारळाचे पाणी एकत्रितरित्या फवारल्यामुळे गव्हाचे चांगले पोषण झाले आहे. तिसरी फवारणी दह्याचे ताक करून केली त्यामुळे गव्हाला रोगप्रतिकारक शक्ती मिळाली. गहू १०० टक्के ओंबीमध्ये आल्यानंतर गायीचे कोवळे दुधाची(चीक) फवारणी केली त्यामुळे गव्हामध्ये अधिकची पौष्टिकता तयार झाली आहे.
“अधिक उत्पादनाची अपेक्षा न ठेवता शेतकऱ्यांनी आरोग्याच्या हिताची शेती करावी.सेंद्रिय शेतीतून उतपादन जरी कमी मिळत असले तरी किमान घरी खाण्यापुरती तरी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करावी.कमीतकमी क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने उत्कृष्ट उत्पादन घेता येते.”
– श्री. योगेश जालिंदर डोंगरे