सातारा -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याची चित्रफित पडताळून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले असल्याची माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
शरद पवार हे राज्याचे नव्हे तर देशाचे नेते आहेत. त्यामुळे काल परवा आमदार झालेल्या गोपीचंद पडळकरांनी त्यांच्यावर बोलू नये, असा सणसणीत टोलाही शंभूराज देसाई यांनी लगावला. श्री. देसाई म्हणाले, “शरद पवार राज्याचा स्वाभिमान आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अशा पध्दतीने बेतालपणे बोललेले राज्यातील स्वाभिमानी जनता सहन करणार नाही. पवारांचे देशाच्या व राज्याच्या राजकारणात व समाजकारणात मोठे योगदान आहे. काल परवा आमदार झालेल्यांना हे कळणार नाही. देशावर आपत्ती आली तेव्हा शरद पवार नावाचा माणूस मदतीला धावला आहे.’
पडळकर आज ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे नेते व तत्कालिक पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनीसुद्धा पवारांचे योगदान मान्य केले आहे. त्यांनीच पवारांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख करून संकट दूर केल्याची जाण पडळकरांनी ठेवण्याचा सल्ला देसाई यांनी दिला आहे. जनतेचा रोष काय असतो हे पडळकरांना भविष्यात दिसून येईल, असेही श्री. देसाई यांनी नमूद केले.