नवी दिल्ली – भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील मायदेशात खेळली जाणारी एकदिवसीय मालिका 6 फ्रेबुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मा संघात पुनरागमन करणार आहे. मात्र, उपकर्णधार केएल राहुल पहिल्या एकदिवसीय सामन्यात अनुपस्थित राहणार आहे. राहुलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.
केएल राहुल पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी अनुपस्थितीत आहे. तर दुसरीकडे संघाचा दुसरा उपकर्णधार जसप्रीत बुमराहला वेस्ट इंडीजविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. अशात संघातील इतर खेळाडूंकडे पहिल्या सामन्यात उपकर्णधार बनण्याची संधी तयार झाली आहे. शिखर धवनने मागच्या वर्षी श्रीलंका दौऱ्यात संघाचे नेतृत्व केले होते. परंतु वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऋषभ पंत उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळेल, अशी शक्यता आहे.
बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वीची सद्यस्थिती पाहता पंतला उपकर्णधार पदाची संधी आहे. कारण, केएल राहुल दुसऱ्या सामन्यापासून मालिकेत सहभागी होणार आहे.
शिखर आणि ऋषभ दोघेही उपकर्णधार बनण्यासाठी दावेदार आहेत. एका यष्टीरक्षकाच्या भूमिकेत ऋषभ तसाही कर्णधाराला रिव्यू आणि क्षेत्ररक्षणच्या निर्णयात खूप काही सांगतो. जर या दृष्टीकोणातून पाहिल्यास त्याला उपकर्णधार बनवले जाऊ शकते, असे त्याने सांगितले.