नवी दिल्ली – विरोधी पक्षांच्यावतीने पुढील आठवड्यात राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तृणमुल कॉंग्रेस, द्रमुक आणि कॉंग्रेसच्यावतीने हा प्रस्ताव आणला जाईल आणि बाकीचे पक्ष त्याला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. सभागृहात पेगॅसस प्रकरणावरून पेच निर्माण झाला आहे.
या विषयावरून सभागृहात रितसर चर्चा केली जावी अशी विरोधकांची मागणी आहे, पण ती मागणी अध्यक्षांनी सतत फेटाळून लावली आहे. सरकारनेही अशा प्रकारच्या चर्चेला आपण राजी नाही असे या आधीच स्पष्ट केले आहे. तशातच तृणमुलच्या एका सदस्याला अधिवेशन संपेपर्यंत निलंबीत करण्यात आले आहे.
या साऱ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून नायडु यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. सरकार आणि विरोधक एकेमकांच्या विरोधात ठामपणे उभे आहेत. यावर माघार कोणी घ्यायची किंवा तडजोड कोणी करायची यावरून सुद्धा वाद घातला जात आहे.
सभागृह चालवण्याची जबाबदारी सरकारवरच येते असे विरोधकांचे म्हणणे आहे तर विरोधकच महत्वाच्या विषयावर चर्चा घडवून न आणता कामकाज रोखून धरत आहेत अशी भूमिका सरकारने घेतली आहे. या वादाला आता या अविश्वास प्रस्तावाच्या निमीत्ताने वेगळेच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.