व्यंकय्या नायडूंनी दिले फेरविचाराचे आदेश
नवी दिल्ली : राज्यसभेतील मार्शलच्या बदलेल्या गणवेशावरून नव्या वादाला सुरूवात झाली आहे. त्यातच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नव्या गणवेशाचा फेरविचार करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यसभेच्या 250 व्या सत्राला सोमवारी सुरुवात झाली. त्यावेळी राज्यसभेतील मार्शल नव्या गणवेशात दिसले होते. हा गणवेश लष्करी पद्धतीचा आहे. त्यामुळेच त्याच्यावर आक्षेप घेतला जातो आहे.
लष्कराचे माजी लष्करप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, लष्कराच्या गणवेशाची कॉपी करून त्या पद्धतीचे गणवेश नागरी स्वरुपाची कामे करणाऱ्या लोकांनी घालणे बेकायदा आहे. यामुळे सुरक्षिततेचे प्रश्नही निर्माण होऊ शकतात. या प्रकरणी संबंधित लोक लवकर योग्य तो निर्णय घेतील अशी मला आशा आहे.
मार्शलसाठी आधी पांढऱ्या रंगाचा फेटा आणि सफारी अशा स्वरुपाचा गणवेश होता. त्यामध्ये पूर्णपणे नव्याने बदल करण्यात आला आहे. नवा गणवेश हा लष्करी स्वरुपाचा आहे. त्यामुळेच त्याच्यावर आक्षेप घेतला जातो. कॉंग्रेसचे जयराम रमेश यांनी सोमवारीच हा मुद्दा उपस्थित केला होता. पण व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेतील निधन झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असल्यामुळे जयराम रमेश यांना याबद्दल नंतर आपले मत मांडण्यास सांगितले होते.