- आम्हा वाचकांची भूक कधी भागणार?; ज्येष्ठ नागरिकांचा सवाल
कर्जत – तब्बल चार महिने उलटूनही सार्वजनिक वाचनालय बंद असल्याने पुस्तक, वाचन प्रेमींची चांगलीच कोंडी झाली आहे. करोनाचा वाढता संसर्ग पाहता ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव आहे.त्यामुळे कथा, कादंबऱ्या आदी पुस्तक वाचन हा त्यांच्यासाठी उत्तम विरंगुळा तशीच आवड सुद्धा आहे; मात्र वाचनालय उघडण्यास शासनाची परवानगी नसल्याने ही परवानगी कधी मिळणार आणि आम्हा वाचकांची भूक कधी भागणार असा सवाल ज्येष्ठ नागरिक तसेच पुस्तकप्रेमी करीत आहेत.
करोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी केंद्र, राज्य सरकारने लॉकडाऊन घोषीत केला. याचा फटका सर्वांनाच बसला. यातून सार्वजनिक वाचनालयेही सुटली नाहीत. आता गेल्या काही दिवसांत सरकारने हळहळू परिस्थितीचा अंदाज घेत काही बाबतीत अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. मात्र सार्वजनिक वाचनालयांबाबत कोणताही निर्णय अद्यापी घेतला गेला नसल्याने ती अद्याप बंदच आहेत. त्यामुळे पुस्तकप्रेमींची चांगलीच कोंडी झाली आहे. जसे अन्य गोष्टींवरचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे सार्वजनिक वाचनालयांबाबत ही निर्णय व्हावा, विचार व्हावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शासनाने वाचनालय उघडून पुस्तके घरपोच वाचायला मिळाल्यास विरंगुळ्यासाठी कुठे बाहेर पडण्याची गरज उरणार नाही आणि आमच्या मनावर असलेला ताण कमी होण्यासही नक्कीच मदत होईल.
– रमण गांगल, ज्येष्ठ नागरिक तथा पुस्तक प्रेमी, कर्जत