कर्जत – करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंन्स, मास्क लावणे हे नियम सर्वसामान्य व्यक्तींना जसे लागू आहेत तसेच शासकीय अधिकाऱ्यांसुद्धा आहेत. मात्र कर्जत तहसील कार्यालयात यांचे सर्रास उल्लंघन होत असताना वरिष्ठ केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या सर्व प्रकारचे छायाचित्रण करीत पोलीस मित्र संघटनेने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केले. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्ती आपल्या कामानिमित्त कर्जत तहसील कार्यालयात गेला आणि एखाद्याने चुकून मास्क लावला नसेल, किंवा तोंडावरून बोलताना खाली सरकवला अथवा सोशल डिस्टन्स न पाळता जवळ आला की खसकन त्या समोरच्या नागरिकांवर ओरडतात. दंडात्मक कारवाईची भीती दाखवतात आणि दुसरीकडे स्वतः मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेले नियम बिनधास्त पायदळी तुडवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोमवारी पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ मुने, रमेश कदम शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई कामानिमित्त कर्जत तहसील कार्यालयात गेले असता त्यांना याच कार्यालयातील दीपक राठोड या लिपिका शेजारी नेरळ मंडळ अधिकारी माणिक सानप अगदीच खेटून बसलेले तेही मास्क न घातलेले दिसून आले . जर या कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींना मास, सोशल डिस्टन्सिंग नियम बंधनकारक आहे, तर या शासकीय अधिकाऱ्यांना ते नाहीत का ? असा सवाल पोलीस मित्र संघटनेने उपस्थित करत त्यांचे छायाचित्रण केले आणि वरिष्ठ कार्यालयाकडे निवेदनाद्वारे सादर करत अशा अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
याबाबत नायब तहसीलदार संजय भालेराव यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी कोणतेही भाष्य अथवा कारवाई न करता मंडळ अधिकारी सानप याना त्यांच्या केबिनमध्ये बोलावून स्वतःकडचा नवीन मास्क दिला. त्यामुळे सामान्य व्यक्तींना कारवाईची भाषा करणारे अधिकारी मात्र आपल्या सहकाऱ्यांबाबत सोयीची भूमिका घेताना दिसून येत आहे.