नवी दिल्ली – कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी राजस्थानमधील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांच्या वैयक्तिक धार्मिक भक्तीवर आक्षेप घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी भाजपने निवडणूक आयोगाकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि अर्जुन राम मेघवाल आणि पक्षाचे नेते अनिल बलुनी, ओम पाठक यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला निवेदन सादर करून कॉंग्रेस सरचिटणीस विरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रियंका गांधी यांनी 20 ऑक्टोबर रोजी दौसा येथील सभेत बोलताना असे वक्तव्य केले होते की, मी टीव्हीवर एक न्युज रिपोर्ट पाहिला. त्यात असा दावा केला गेला आहे की मोदींनी एका मंदिरात देणगी म्हणून एक लिफापा सादर केला. हा लिफापा उघडून पाहिला असता त्यात फक्त 21 रूपये होते. टीव्हीवरील ती बातमी खरी आहे की नाही याचा मला कल्पना नाही असेही प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या. त्यावरून प्रियंकांनी भाजपवर (bjp) असा हल्लाबोल केला की निवडणुकीपुर्वी भाजपकडून लोकांना असेच लिफापे दाखवले जातात पण निवडणुकीनंतर त्या लिफाप्यात काहीही आढळत नाही. (Congress vs bjp)
त्यावरून भाजपचे नेते संतप्त झाले आणि त्यांनी प्रियंकांवर कारवाईच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. पत्रकारांशी बोलताना भाजप नेते मेघवाल आणि पुरी म्हणाले की प्रियंकांनी विद्यमान कायद्यांनुसार “गुन्हा” केला आहे.
त्या धार्मिक भावनांचा वापर करून ते असंतोष निर्माण करत आहेत असे सांगून मेघवाल म्हणाले की, मोदींच्या देणगीशी संबंधित दावा खोटा आहे आणि ते अधोरेखित झाले आहे. ही घटना मोदींच्या जानेवारी महिन्यातील मंदिर भेटीच्या संबंधात आहे. पंतप्रधानांच्या मंदिर भेटीच्या संदर्भात ती अजूनही खोटे बोलत आहे, असे ते म्हणाले.प्रियंकाच्या वक्तव्यामुळे भारतीय दंड संहिता आणि लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे भाजपने म्हटले आहे.