हेळगाव – देशाचे भविष्य युवकांच्या हाती आहे. ही बाब खरी असली तरी आजच्या परिस्थितीला देश करोनातून वाचणे, हे देखील युवकांच्या हाती आहे. संपूर्ण भारत देश आता करोना विरुद्धची लढाई लढत आहे. अगदी मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत. गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत तसेच सर्वसामान्य नगरिकांपासून ते नेत्यांपर्यंत एकच विषय समोर आहे, तो म्हणजे करोना विषाणूच संकट.
करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळून संपूर्ण भारत देश पूर्णपणे बंद ठेवला आहे. दिवसेंदिवस या आजाराचे प्रमाण वाढत आहे. जिल्हाबंदी तर केलीच आहे परंतु, गावबंदीपर्यंत परिस्थिती येऊन ठेपली आहे. खऱ्या अर्थाने येणारे 21 दिवस हे देशाची पुढची दशा आणि दिशा ठरवणारे असेच आहेत.
या कालावधीत जनतेला प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळले आणि कोणीही घराबाहेर आले नाही, काळजी घेतली आणि प्रशासनास सहकार्य केले तरच आपला देश करोनाच्या प्रकोपातून वाचेल. अन्यथा येणारा काळ कसा असेल याची कल्पना न केलेलीच बरी. भविष्यातील धोका लक्षात घेऊन संपूर्ण भारत पूर्णपणे बंद ठेवला आहे. यातून फक्त जीवनावश्यक बाबींना सूट देण्यात आली आहे.
मुलांना सुट्टी म्हटलं की, अत्यानंद होतो. त्यामुळे मुलांना हा काळ आनंदाचा काळ वाटत आहे. महिलावर्ग जास्त घराबाहेर पडण्याचा प्रसंग येत नाही.
मुलींची परिस्थिती याहून काही वेगळी नाही. वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा कामाशिवाय बाहेर पडत नाहीत. परंतु, नेमकी याउलट परिस्थिती युवकांची आहे. हा वर्ग जास्तकाळ घरात थांबू शकत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने हा घराबाहेरच असतो. आणि नेमकी हीच बाब करोनाला खतपाणी घालत आहे. कारणाशिवाय सतत घराबाहेर राहिला आणि कुठून तरी या विषाणूचा संपर्क घेऊन स्वतः बरोबरच संपूर्ण कुटुंबाला होणार आणि संपूर्ण कुटुंब या आजाराने बाधित होणार.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यावर आता उपाय म्हणून पोलीस हे विनाकारण फिरणाऱ्या मुलांना चोप देऊ लागले आहेत. सरकार आव्हान करीत आहे, तरीदेखील युवकांकडून या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. म्हणून पोलीस प्रशासनास कठोर पाऊल उचलावे लागत आहे. सध्याच्या परिस्थितीत युवकाने जर कारणाशिवाय बाहेर फिरणे थांबवले आणि शासनाने तसेच आरोग्य विभागाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला तर हा आजार निश्चित आटोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. नाही तर जगाच्या पाठीवर आज इतर देशांची जी अवस्था करोनामुळे झाली आहे, तीच अवस्था भारताची सुद्धा झालेली दिसेल. म्हणूनच सध्या युवक थांबला तरच करोना थांबेल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने स्वतःला झाकून दिले आहे. जीवनावश्यक बाबी वगळल्यातर सर्व काही बंद आहे. यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. असे असतानाही शाळा, कॉलेजचा युवक मात्र काही केल्या घरी थांबण्यास तयार नाही. शहरात येण्याचा प्रयत्न, गावात, गल्ली, चौकात घोळका करून बेजबाबदारपणे उभे दिसत आहेत. त्यांना सांगून कळत नसेलतर पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे.