कामशेत – मावळ तालुक्यात रेल्वे प्रवाशांच्या मागण्या व अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न केला जात आहे; मात्र गेली अनेक वर्षांपासून केवळ बैठकांमधील चर्चेवरच हे प्रशन चर्चिले जात आहेत. लोकप्रतिनिधींच्या सूचना केवळ लिहून घेण्याचे सोपस्कर पूर्ण केले जात आहे. प्रलंबित कामे आणखी किती काळ रेंगाळणार आहेत? असा सवाल आता प्रवासी व नागरिकांना पडला आहे.
सकाळी 10.05 वाजता लोणावळा स्थानकावरून लोकल आहे. त्यानंतर सुमारे पावणे पाच तास एकही लोकल नाही. दुपारी 2.50 वाजता नंतरची लोकल सुटते. वडगाव, कान्हे, कामशेत, मळवली या परिसरातून लोणावळा येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. अनेक नागरिक वेगवेगळ्या कामांसाठी लोणावळा शहरात जात असतात. त्यामुळे प्रवासी विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तब्बल पावणे पाच तास लोकल नसल्याने या सर्वांची गैरसोय होते. शाळा-महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी रेल्वे स्थानकावर बसतात. इथे अपघात तसेच अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यात बराच वेळ रेल्वे स्थानकावर गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.
कान्हे येथील एमआयडीसीकडे जाण्यासाठी रेल्वेमार्गावर उड्डाणपूल नसल्याने दिवसभर रेल्वे फाटकावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. यामुळे कामगार कंपनीत वेळेवर पोचू शकत नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. अनेक उद्योगांनी या भागातून काढता पाय घेतला आहे. कान्हे फाटा येथे रेल्वे उड्डाणपूल उभारण्याच्या कामासाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र तिथे जमीन संपादित करण्यासाठी काही अडचणी येत आहेत. त्याकरिता राज्य सरकार व मध्य रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत हा मुद्दा मार्गी लागू शकणार आहे. त्यादृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे. याशिवाय तसेच वडगाव येथील भूमिगत मार्गाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी नागरिक व लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून केवळ बैठकांमध्ये चर्चाच होत आहे.
मावळातील रेल्वशी संबंधित ासमस्या सोडविण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहेत. याबाबत केवळ आश्वासने आणि चर्चाच होत असल्याने प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिले आहेत.
प्रस्तावावर कार्यवाही नाही
सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. ही गाडी सुरु झाल्यानंतर तिला तळेगाव स्थानकावर थांबा देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. सिंहगड एक्सप्रेसला तळेगाव येथे थांबा देण्यासाठी तांत्रिक बाबींची पडताळणी सुरु आहे. पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी ब्लॉकच्या कारणास्तव बंद केली आहे. ही गाडी सुरु झाल्यानंतर तिला देखील तळेगाव येथे थांबा दिला जाणार आहे. मात्र कार्यवाही नसल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.