कायद्यापुढे यंत्रणा हतबल; देवस्थानातील चोऱ्यांत सहभाग
प्रा. जनार्दन लांडे पाटील
शेवगाव – सध्या शेवगाव तालुका व परिसरातील विविध देवस्थाने चोरट्यांचे लक्ष्य बनली आहेत. दादेगावचे शनिमंदिर, शेवगावमधील महादेव मंदिर, अमरापूर भैरवनाथ देवालय, लोहसर भैरवनाथ व वृद्धेश्वर देवस्थान या ठिकाणी दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या. तर तारकेश्वर गडावरील रुक्मिणी मातेचा सर व पोथ, श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानातील देवीची आभूषणे, हनुमान टाकळीच्या कळसाचीच चोरी झाली. अशा एक ना अनेक देवस्थानात लक्षावधीच्या ऐवजाच्या सलग चोऱ्या झाल्याने देवस्थाने सातत्याने होणाऱ्या चोऱ्यामुळे हतबल झाली आहेत.
यातील काही चोऱ्यांचे तपास लागला. त्या तपासात निष्पन्न झालेले बहुतेक आरोपी अल्पवयीन आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चोरीची कबुली व माहिती मिळविणे पोलिसांना जिकिरीचे जाते. त्यांच्याकडून चोरीची सत्यस्थिती उघडकीस आणण्यासाठी कोणत्याही डिग्रीचा वा पोलिसी खाक्याचा उपयोग करता येत नाही. एखाद्या चोरी प्रकरणात सहभाग असलेला आरोपी अल्पवयीन म्हणून त्याचे नाव जाहीर न करता सन्मानाने त्याला सोडून द्यावा लागतो.
परिसरातील चोरी प्रकरणात असे सोडण्यात आलेले अल्पवयीन आरोपी चार-सहा दिवसात झालेल्या दुसऱ्या चोरी प्रकरणात पुन्हा सापडले आहेत. ही वस्तुस्थिती असल्याने कायदे पंडित, न्याय प्रक्रियेतील अभ्यासक आणि सरकारने अल्पवयीन आरोपी संदर्भातील कायद्यात उचित बदल करायला हवा. किमान एकदा उघडकीस आलेला अल्पवयीन आरोपी जर दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा आढळला तर त्याला अल्पवयीन म्हणून कोणतीही दया वा सूट दाखविण्यात येऊ नये, अशी तरतूद हवी तरच या प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसू शकेल.
या परिसरात झालेल्या चोऱ्यामध्ये जिथे चोरी करायची त्या देवस्थानाची रेकी करण्याच्या कामापासून प्रत्यक्ष चोऱ्या करण्यात अल्पवयीन आघाडीवर होते, असे आढळले आहे. शिवाय एका चोरीमध्ये निष्पन्न झालेले मात्र अल्पवयीन म्हणून पोलिसांनी सोडून दिलेले आरोपी तीन-चार दिवसात जवळपासच्या देवस्थानामध्ये झालेल्या अनेक चोऱ्यामध्ये पुन्हा आढळून आले आहेत. त्यात बहुतेक अल्पवयीन आरोपींची कौटुंबिक पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीचीच असून त्यांच्या आई वडिलांनी विविध चोऱ्या दरोड्याच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार म्हणून अनेकदा जेलच्या वाऱ्या केल्या आहेत. कारावासाच्या शिक्षा भोगल्या आहेत.त्यामुळे चोरीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालेले असते. लहानपणापासूनच त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळे बाप से बेटा सवाई होण्याकडे त्यांचा कल असतो.
अल्पवयीन आरोपींना मिळणाऱ्या तरतुदीचा फायदा सध्या राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रात देखील नियोजनपूर्वक उठवला जात आहे. ती वेळीच रोखणे आवश्यक आहे. मध्यंतरी काही दिवसापूर्वी शेवगावात दंगल झाली. यात जवळपास चारशे जणांवर कारवाई करण्यात आली, मात्र या दंगलीचा प्रारंभ देखील अल्पवयीन मुलांनीच केला असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांना व पोलीस प्रशासनाला माहिती आहे. तरीही पोलिसांना अशा अल्पवयीन मुलांना गुन्ह्यातून वगळावे लागले.
जम्मू – काश्मीरमध्ये मागे उसळलेल्या दंगलीत देखील अल्पवयीन आघाडीवर होते. तेथे तर अल्पवयीन मुलांना प्रशिक्षण देऊन दंगली घडविण्यात येत असे उघड झाले आहे. अनेकदा यातील आरोपी कागदोपत्री अल्पवयीन असतात. चांगले धष्टपुष्ट थोराड शरीरयष्टी व देहबोलीवरून ते सज्ञान असल्याचे जाणवते, मात्र कायद्यातील तरतुदी पुढे सर्वच हतबल असल्याने याबाबत सकारात्मक भूमिकेतून निर्णय व्हायला हवा. तसा चाप बसला तर अनेक गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल.
जिल्ह्यात चोरी, घरफोडीच्या घटना उघडकीस आल्यानंतर त्यात अनेक वेळा अल्पवयीन मुले सहभागी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
घटना तयार करताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अल्पवयीनांसाठी वेगळे कायदे केले.आज कायद्यात सूधारणा करण्याची वेळ आली आहे. या कायद्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पहिल्यांदाच पकडलेल्या अल्पवयीन आरोपीस समज देऊन सोडावे.मात्र परत पकडण्यात आले असता त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
जगदीश धूत , सामाजिक कार्यकर्ते, शेवगाव