नवी दिल्ली – भारतातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलासा देणारी तुलनात्मक आकडेवारी जारी केली. त्यानुसार, देशात प्रतिलाख लोकसंख्येमागे करोनाबाधितांचे प्रमाण केवळ 30.04 आहे. त्यामुळे प्रतिलाख लोकसंख्येमागे सर्वांत कमी बाधितसंख्या असणाऱ्या जगातील देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
प्रतिलाख लोकसंख्येतील बाधितांच्या प्रमाणाचा विचार करता जागतिक सरासरी भारताच्या तुलनेत जवळपास चौपट म्हणजे 114.67 आहे. ते प्रमाण करोना संकटाचा सर्वांधिक फटका बसलेल्या अमेरिकेत 671 पेक्षा अधिक आहे. त्याखालोखाल जर्मनीत 583, तर स्पेनमध्ये 526 इतके प्रमाण आहे. प्रतिलाख लोकसंख्येमागे बाधितांचे प्रमाण ब्राझीलमध्ये 489 तर ब्रिटनमध्ये 448 इतके आहे. रशियातही ते प्रमाण 400 पेक्षा अधिक आहे. ती आकडेवारी पाहता भारतातील बाधितांचे कमी प्रमाण हे केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या बरोबरीने केलेल्या प्रतिबंधात्मक आणि सक्रिय उपाययोजनांचे फलित असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
देशात रविवार सकाळपासून 24 तासांत 9 हजार 440 बाधित करोनामुक्त झाले. त्यामुळे देशात आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 2 लाख 37 हजारांवर गेली आहे. देशातील बाधित करोनामुक्त होण्याचे प्रमाण 55.77 टक्के इतके आहे. देशात सध्या 1 लाख 74 हजारांहून अधिक सक्रिय बाधित आहेत. त्यांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या दिलासादायी आहे.