माधव विद्वांस
बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांचा आज स्मृतिदिन (निधन 23 जून 1761). ते पहिले बाजीराव व काशीबाई यांचे ज्येष्ठ पुत्र. त्यांचा जन्म मौजे साते (नाणे मावळ- पुणे जिल्हा) येथे 12 डिसेंबर 1721 रोजी झाला. त्यांनी चिमाजी आप्पा आणि अंबाजी पुरंदरे यांच्या हाताखाली लहानपणी साताऱ्यात सर्व प्रकारचे शिक्षण घेतले. पहिल्या बाजीरावाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंनी त्यांना 25 जून 1740 रोजी पेशवाईची वस्त्रे दिली.
नानासाहेब वर्ष 1739 मध्ये शाहू महाराजांबरोबर मिरज मोहिमेत सामील झाले होते. त्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्यास स्थैर्य आले. शाहू महाराजांच्या पश्चात नानासाहेबांना हटविण्याचा मोठा प्रयत्न झाला. दमाजी गायकवाड साताऱ्यावर हल्ला करण्यासाठी आले, पण मधेच त्यांनी फौज पुण्याकडे वळविली. यामुळे नानासाहेबांच्या मातोश्री काशीबाई आणि त्यांच्या आजी राधाबाई यांना सिंहगडावर आश्रय घ्यावा लागला.
दामाजी साताऱ्याकडे जात आहे, असे कळताच त्र्यंबकराव पुरंदरे यांनी 20 हजारांची फौज घेऊन दामाजीवर निंब येथे हल्ला केला. पण त्यात त्यांना यश आले नाही व साताऱ्यास दामाजीचा वेढा पडला; पण त्र्यंबकरावांनी पुन्हा 15 मार्च 1751 रोजी वेण्णा नदीच्या काठावर दामाजीच्या छावणीवर हल्ला चढविला. या हल्ल्यात दामाजीचे मोठे नुकसान झाले आणि त्यास माघार घ्यावी लागली.
हे सर्व घडत असताना नानासाहेब बिदरच्या मोहिमेत गुंतले होते. त्यांना खबर मिळताच ते परत साताऱ्याकडे निघाले. नानासाहेब पेशव्यांनी लष्करी कारवाई करून निजामाच्या ताब्यातील जुन्नर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर हे जिल्हेदेखील स्वराज्यात आणले. त्यांच्या कारकिर्दीत पुणे शहरांत पेठा वसवणे, मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, आंबराया लावणे, तलाव-विहिरी बांधणे, नद्यांना घाट बांधणे, धर्मशाळा उभारणे इत्यादी कामे पार पडली. नानासाहेबांच्या कारकिर्दीतच गायन, शाहिरी, नृत्य इत्यादी कलांना वाव मिळाला.
सतत मोहिमेत असले तरी राज्याची आर्थिक घडी त्यावेळी चांगली बसली होती. जमिनीचा दर्जा पाहून जमीन महसुलाचे दर आखण्यात आले. वाहतुकीचे मार्ग सुधारले आणि महाराष्ट्राचा व्यापार वाढविला. शेती सुधारली. परकीय आक्रमणे थांबल्यामुळे आणि बाहेरून खंडणीच्या रूपाने येणाऱ्या द्रव्याने महाराष्ट्र समृद्ध झाला. काही गोष्टी जमेच्या असल्या तरी इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज यांचेकडे दुर्लक्ष झाले.
1757 मध्ये इंग्रजांनी प्लासीची लढाई जिंकली आणि गंगेच्या काठाने आपले जाळे टाकण्यास सुरुवात केली व हळूहळू दिल्लीकडे पोहोचले. अब्दालीच्या आक्रमणात मराठ्यांच्या सैन्यास पानिपत येथे हार पत्करावी लागली. सदाशिवराव भाऊ व पुत्र विश्वासराव यांच्या वीरगतीमुळे खचलेले नानासाहेब आजारी पडले व पर्वतीमंदिर परिसरातील वाड्यामध्ये त्यांचे निधन झाले.